शस्त्रसंधी आमच्या अटींवर की अमेरिकेच्या : प्रकाश आंबेडकर
मोदींचं कमकुवत नेतृत्त्व, शस्त्रसंधीची माहिती आधी ट्रम्पकडून...

राष्ट्रीय : भारत पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीची बातमी आपल्याला पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली? भारतीय पंतप्रधान कार्यालय किंवा परराष्ट्रमंत्री यांच्याकडून का नाही ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला केला आहे.
शस्त्रसंधी आमच्या अटींवर झाली की अमेरिकेच्या?
प्रकाश आंबेडकर यांनी भारत पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमांच्या ब्रिफिंगवरून हे स्पष्ट झाले होते की, या संघर्षात आमचाच वरचष्मा होता. पाकिस्ताने स्वतःहून हल्ला केला असतानाही आम्ही अमेरिकेचे ऐकले आणि युद्धबंदीला का सहमती दर्शविली? असा सवाल त्यांनी केलाय. तसेच अमेरिका पाकिस्तानला वाचवू शकेल आणि त्यांचा विश्वास संपादन करू शकेल, यासाठी अमेरिकेने भारताला युद्धबंदीला सहमती दर्शवण्यास भाग पाडले, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा – महावितरणकडून शहरात मॉन्सूनपूर्व कामांना वेग
अमेरिकेने ही एक संधी म्हणून पाहिले आणि..
चीनसारख्या इतर जागतिक शक्तींशी धोरणात्मक भागीदारी करून पाकिस्तानने अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी मदतीवरील आपले अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी केले आहे. या संघर्षादरम्यान चीनने पाकिस्तानला आपत्कालीन शस्त्रास्त्रे पुरवली नाहीत. पाकिस्तानला तुर्कीवर अवलंबून राहावे लागले. अमेरिकेने ही एक संधी म्हणून पाहिले आणि पाकिस्तानच्या समर्थनात पाऊल टाकले. त्यानंतर पाकिस्तानसाठी युद्धबंदीची मध्यस्थी केली, असे विश्लेषण प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट भारतासाठी खूप चिंताजनक आहे, असेही ते म्हणाले.
अमेरिकेने काश्मीरचे आंतरराष्ट्रीयीकरण केलं
अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प दोन गोष्टींबद्दल बोलले आहेत, एक म्हणजे काश्मीरवर तोडगा आणि पाकिस्तानसोबतचा व्यापार वाढवणे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, म्हणूनच हा भारताचा अविभाज्य मुद्दा आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या विधानात काश्मीरचा उल्लेख का केला आहे? त्यांनी काश्मीरचे आंतरराष्ट्रीयीकरण केले आहे आणि पाकिस्तानच्या हिताचे विधान केले आहे. पाकिस्तानसोबत व्यापार वाढवून अमेरिका आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या समर्थित पाकिस्तानमध्ये रूपांतरित करण्यास अमेरिका मदत करत आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आर्थिकदृष्ट्या समर्थित पाकिस्तान सीमापार दहशतवादाला अधिक प्रोत्साहन देईल. ही तथ्ये खरोखरच चिंताजनक आहेत. यातून पंतप्रधान मोदी यांचे कमकुवत नेतृत्व उघड होते, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवरही बोट ठेवले.