अतिशहाणपणा केल्यानेच मला करोना झाला – जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. करोनावर मात केल्यानंतर जितेंद्र आव्हाड घरी परतले आहेत. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आपण अती शहाणपणा केल्यानेच आपल्याला करोना झाल्याचं म्हटलं आहे. “१० तारखेला डॉक्टरांनी मला रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं होतं. पण अतिशहाणपणा करण्याचा माझा स्वभाव आहे. त्याला आता मुरड घालावी लागेल. लोकांमध्ये जाण्याची जी सवय होती त्याचे परिणाम भोगावे लागले,” अशी खंत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
“अतिशहाणपणा केल्यानेच मला करोना झाला. लोकांनी मला मास्क घाला सांगितलं होतं. गर्दीत गेल्यावरच मी अनेकदा मास्क वर नाकावर सरकवून घ्यायचो. हे नियम समाजाने पाळायला हवेत. नियम पाळले असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. एक अद्दल घडवण्यासाठीच कदाचित हे सगळं घडलं असं माझं मत आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. “मला करोना झाला आहे हे माहितीच नव्हतं. आयसीयूत असताना जेवणासाठी जे ताट यायचं त्यावर करोना रुग्ण लिहिलेलं पाहून मला करोना झाला असल्याचं कळालं,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. करोना झाल्यापासून ते रुग्णालयात दाखल होईलपर्यंतचं मला काहीच आठवत नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.