‘निवडणुकीच्या यंत्रणेला मोदीकृत भाजपाचे षडयंत्र’; EVM मशीनवरून संजय राऊतांची भाजपवर टीका
मुंबई | राज्यात दुसऱ्या टप्प्यात आज आठ मतदारसंघांमध्ये होणार निवडणुकीत चुरशीच्या लढती होणार आहेत. दरम्यान, मतदानाला सुरुवात होताच वर्ध्यात इव्हीएम मशिन नादुरुस्त झाले आहे. यामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे. यावरून ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि आमच्या समोर चोरलेली शिवेसना असा सामना आहे. या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. आठ जागांवर भाजपाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फार संघर्ष करावा लागत आहे. मी आपल्याला वारंवार सांगतोय, प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुका जिंकतील. किंबहुना तेच जिंकतील असं वातावरण आहे. आम्ही ३५ प्लस टार्गेट हा आकडा ठेवला आहे, आम्ही तेवढ्या जागा जिंकू. या आठही जागांवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जिंकत आहे.
हेही वाचा – लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज मतदान, महाराष्ट्राच्या ८ जागांवर मतदानाला सुरूवात
अमरावतीत कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं. वर्ध्यात भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उद्धव ठाकरे अमरावती आणि वर्ध्यात जाऊन आले. ईव्हीएम बंद पडणे आणि मतदारांना खोळंबायला लावणे आणि मग मतदारांनी मतदानाला पाठ फिरवणे हा षडयंत्राचा भाग आहे. अचानक संध्याकाळी मग मशिन चालू होतात ज्यांना हव्या त्यांच्या झुंडी उभ्या राहतात. पण सकाळी मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना नाउमेद करून त्यांना परत पाठवणे हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र आहे, असं संजय राऊत म्हणाले.