#TransfersOfPolice Officers: ‘पोलीस अधिकाऱ्यांची बदली’ प्रकरणावरून गिरीश महाजन आक्रमक; ठाकरे सरकारवर निशाणा
जळगाव | भाजपचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीप्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. या महाविकास आघाडी सरकारचा गलथान कारभार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून आणि पुन्हा त्यांना स्थगिती देण्याच्या प्रकारातून समोर आला आहे, अशा शब्दात महाजन यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने या पक्षांची तोंडे वेगवेगळी आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही सांगितले की त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोध करतो. राष्ट्रवादीने काही निर्णय घेतला की त्याला मुख्यमंत्री नकार देतात. त्यामुळे कशा पद्धतीने महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरू आहे हे कळत नाही, असे सांगत राज्यात असे दिवस यापूर्वी कधीच आले नव्हते, असाही टोला गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारचा लगावला.
या सरकारमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा, शेतकर्यांचा असा कुठलाही प्रश्न असो, त्याबाबत एकमताने निर्णय घेतला जात नाही. एकदा निर्णय घेतला कि तो पुन्हा बदलला जातो. असे एक नाही अनेक उदाहरणे आहेत, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
आघाडी सरकारच्या सर्व खात्यांमध्ये कमिशनचा धंदा- महाजन
गृह खातेच काय, तर या महाविकास आघाडी सरकारमधील सर्वच खात्यांमध्ये कमिशनचा धंदा जोरात सुरू असल्याचा गंभीर आरोपही यावेळी गिरीश महाजन यांनी केला. टेंडर घेतानाही पैसे मागतात आणि कामाची बिले काढतानाही पुन्हा टक्केवारीनुसार पैसे मागतात. असा त्रास आम्ही सहन करत असल्याचे ठेकेदार सांगतात, असा ही गौप्यस्फोट महाजन यांनी केला. तीनही पक्ष ओरबाडायला बसले आहेत. कोणीच कोणाचे ऐकत नसल्याने हा सर्व प्रकार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.