उद्धव–राज ठाकरे एकत्र येण्यासाठी २० वर्षे का लागली? ठाकरे बंधू म्हणाले…

मुंबई | राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी येत्या १५ तारखेला मतदान होणार असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सुमारे २० वर्षांनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. या राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, सामना वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत दोन्ही नेत्यांनी २० वर्षांनंतर एकत्र येण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. ही मुलाखत शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतली.
या मुलाखतीत एकत्र येण्यासाठी एवढा काळ का लागला, या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, मला वाटतं की काही गोष्टी का घडतात? कशा घडल्या? मला वाटतं या गोष्टी आता सोडून दिल्या पाहिजेत. मी एका मुलाखतीत सांगितलं होते की कुठच्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि आज संकट महाराष्ट्रावरती, मुंबईवरती आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांवर आहे. जे संकट आहे ते मराठी माणसाला समजलं आहे. ती एकच गोष्ट या एकत्र येण्याचं सर्वात मोठं कारण आहे. आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही. तर हा महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे.
हेही वाचा : चऱ्होली प्रभाग क्र. ३ मध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार झंझावात
एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करत राज ठाकरे पुढे म्हणाले, आज महाराष्ट्र आणि ही निवडणूक अशा एका वळणावर येऊन उभी आहे की ज्याला ‘अभी नही तो कभी नही’ असं म्हणावं लागेल. मुंबई, ठाणे आणि संपूर्ण एमएमआर परिसरात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आज आम्ही एकत्र आलो नाही आणि या संकटाचा सामना केला नाही, तर महाराष्ट्र आम्हाला माफ करणार नाही.
यावर उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले, आम्ही दोन भाऊ एकत्र आलोय हा एक मुद्दा वेगळा आहे, भावनिक आहे. पण दोन भाऊ एकत्र येणं याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर… पक्ष, राजकीय मतं हे असतील, पण आपण मराठी आहोत, महाराष्ट्र आपला आहे. आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या, तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.





