अजितदादांच्या निधनाचं राजकारण करू नये; गिरीश महाजन यांचा रोहित पवारांना टोला

मुंबई | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघाती मृत्यूनंतर राज्यात शोककळा पसरली होती. या घटनेनंतर अपघात की घातपात, याबाबत विविध चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही काही पत्रकार परिषदांमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. यावर आता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. “राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी गलिच्छ राजकारण कोण करत आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
गिरीश महाजन म्हणाले, गलिच्छ राजकारण कुणाकडून सुरु आहे सगळ्यांना दिसतं आहे. पण मी पुन्हा सांगेन की अजित पवारांच्या अपघाती निधनाचं राजकारण कुणीही करु नये. उगाच काहीही बोललं जातं आहे, कुणी म्हणतंय बॉम्ब ठेवला, कुणी म्हणतंय सुसाईड बॉम्बर होता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. कुणीही अकलेचे तारे तोडत आहेत. या प्रकरणाची चौकशी व्हावी ही सगळ्यांची भावना आहे. मुख्यमंत्र्यांनाही हेच वाटतं आहे. त्यामुळे राजकीय पोळी शेकण्यासाठी कुणी व्हल्गर विधान करु नये.
हेही वाचा : इराणच्या तेल साठ्यांवर इस्रायलचे भीषण बॉम्बहल्ले; तेहरान-कारज हादरले
दरम्यान, अजित पवार यांचे पुत्र जय पवार सोमवारी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. या पत्रकार परिषदेत ते काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने तसेच मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. केंद्र शासनाकडूनही गंभीर दखल या अपघाताची घेण्यात आली आहे. कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावं. अपील करायचं असेल तर ते करावं. कुणाला अर्ज करायचा असेल तर करू शकतात. काही मागणी करायची असेल तर करू शकतात. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये १०० टक्के पारदर्शकता आहे. संभ्रम असण्याची काडीमात्र शक्यता नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.





