कल्याणमध्ये पहाटेची पहिली अजान भोंग्याविना, मशिदींबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
कल्याण: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आज म्हणजेच ४ मे रोजीपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. अन्यथा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये आज पहाटेची पहिली अजान ही भोंग्याविना पार पडली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त मशिदीबाहेर पाहायला मिळाला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यायाबाबत आक्रमक पवित्रा घेतला आणि मशिदीवरील भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन मनसे कार्यकर्ते आणि नागरिकांना केलं होतं. याच पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने काल रात्रीपासूनच पाउले उचलण्यास सुरुवात केली.
मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा
कल्याण डोंबिवलीमधील मनसे कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेकडून नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यामध्ये मनसे आमदारांना देखील नोटीस पाठवण्यात आली होती. तर काल रात्रीच्या सुमारास मनसेच्या २० ते २५ कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मशिदीबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त
दरम्यान, काल रात्रीपासूनच कल्याणमध्ये मशिदींबाहेर आणि मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. तसेच, शहरात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मशीद आणि मंदिरांबाहेर पोलिसांचा पहारा दिसून येतोय. याच बरोबर पोलिसांनी मशिदीच्या ट्रस्टींसोबत चर्चा करून आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलं होतं.
पहाटेची पहिली अजान भोंग्याविना
आज कल्याण परिसरातील मशिदींमध्ये पहाटेची पहिली अजान ही भोंग्याविना झाली. अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते. शहरात कायदा-सुव्यवस्था राखावी तसेच शांततेचे आवाहन पोलीस यंत्रणेकडून नागरिक तसेच मनसे कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, मुंबईतून मनसैनिकाला अटक