कऱ्हाडला अखिल भारतीय साहित्य संमेलन
शरद पवारांच्या उपस्थितीत ९ मे रोजी उद्घाटन

कऱ्हाड : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित ३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन नऊ आणि दहा मे या कालावधीत येथे होणार आहे. खासदार शरद पवार यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी आज दिली.
साहित्य संमेलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. साहित्य परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. नितीन नाळे, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष विकास भोसले, सातारा जिल्हा अध्यक्ष संदीप पवार, महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. हनुमंत चिकणे, तालुकाध्यक्ष डॉ. शंकरराव खापे, उपाध्यक्ष डॉ. दादाराम साळुंखे, सचिव प्रकाश पिसाळ, किशोर पाटील, मानसिंग पाटील, वामन अवसरे, सुशील कांबळे, रामचंद्र पाटील, विजय कोळेकर, विद्या पवार, शीला पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा : माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मंतरलेल्या दिवसांचा उजाळा
डॉ. गोरे म्हणाले, ‘‘३१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, परिसंवाद, चर्चासत्र, कथाकथन, कविसंमेलन असा भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. संमेलनात देशभरातील ९०० साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी पुणे, मुंबई, नांदेड, उदगीर, तुळजापूर, लातूर, धाराशिव, वणी, रत्नागिरी, गोंदिया, शेवगाव, बारामती, मंठा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर येथे झाले होते.
नारायण सुर्वे, मंगेश पाडगांवकर, द. मा. मिराजदार, शिवाजी सावंत, सुरेश भट, केशव मेश्राम, विश्वास पाटील, सुवर्णा पवार, श्रीपाल सबनीस, म. दा. हातकणंगलेकर, गंगाधर पानतावणे, जनार्दन वाघमारे, आ. ह. साळुंखे आदी मान्यवर साहित्यिकांनी या संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे. डॉ. डी. वाय. पाटील, बी. जी. शिर्के, उदय सामंत, सुधीर तांबे, प्रा. शिवाजीराव सावंत यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले आहे. जावेद अख्तर, पु. ल. देशपांडे, रमाकांत खलप यांनी संमेलनाचे उद्घाटन केले आहे. कऱ्हाडच्या यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात नऊ आणि दहा मे रोजी हे संमेलन होईल.