“अपघात मुक्त वारी अभियान” उपक्रमास प्रारंभ
वारकऱ्यांच्या सुरक्षित व अपघातमुक्त वारीसाठी जिल्हा पोलिसांचे अभियान
मोहोळ : जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नेरपगार व त्या त्या विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखा सोलापूर, प्रादेशिक परिवहन विभाग व महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या पंढरपूरच्या वारीच्या पार्श्वभूमीवर “अपघात मुक्त वारी अभियान” हा उपक्रम सुरू केला असून, त्याचा आरंभ मोहोळ येथून सोमवार (ता. 23) पासून करण्यात आला.
या संदर्भात अधिक माहिती देताना सोलापूर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे म्हणाले, पंढरपूरच्या आषाढी वारी साठी राज्यभरातून वारकरी पंढरपूरला येतात. त्यात काही मध्यमवयीन, वयोवृद्ध व महिला यांचा समावेश असतो.
मात्र त्यांना कुठलीही इजा होऊ नये त्यांचा अपघात होऊ नये विना संकट वारी व्हावी या साठी चालू वर्षी पासून हे अभियान सुरू केले आहे. हा अपघात मुक्त वारी अभियान उपक्रम 24 तास सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे यावेळी वारीला वारकरी पंढरपूरला जाताना व वारी संपल्या नंतर परत त्यांच्या गावी जातानाही बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा – माटे हायस्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा
जड वाहतुकीस बंदी
अपघात मुक्त वारी उपक्रमासाठी त्या-त्या भागातील स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, नागरिक यांची मदत घेतली जाणार आहे. तसेच त्या त्या परिसरातील मोठी रुग्णालये, रुग्णवाहिका यांची ही मदत घेतली जाणार आहे. दरम्यान जड वाहतुकीस येत्या 29 तारखे पासून बंदी घालण्यात येणार आहे. तर 13 ठिकाणी वाहतूक पॉईंट लावण्यात आले आहेत.
शक्यतो वारीच्या कार्यकालात मॉर्निंग व इव्हीनिंग वॉक टाळावे. गरज असेल तरच वाहनाचा वापर करावा. स्वयंशिस्त पाळली तर 50 टक्के अपघात कमी होतात. मानवी चुका मुळेच जादा अपघात होतात. पालखी व महामार्गावर पोलिसांची गस्त सुरू राहणार आहे. तरी वारकरी बांधवांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक भरणे यांनी केले आहे.





