भारत केवळ बाजारपेठ नाही, तर जागतिक विकासाचा ‘लाँचपॅड’; न्यूझीलंडमध्ये PM मोदींची गुंतवणूकदारांना साद

ऑकलंड : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झाल्यानंतर दोन्ही देशांनी आर्थिक आणि सामरिक संबंधांना नवी दिशा देणारा २०३० पर्यंतचा महत्त्वाकांक्षी रोडमॅप जाहीर केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधील उद्योगजगताला भारतात गुंतवणुकीचे आवाहन करत, “भारत ही केवळ बाजारपेठ नसून जागतिक विकासासाठीचे लाँचपॅड आहे,” असे ठामपणे सांगितले.
न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान आयोजित ‘इंडिया-न्यूझीलंड बिझनेस अँड स्पोर्ट्स एंगेजमेंट’ कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, अवघ्या नऊ महिन्यांत पूर्ण झालेला मुक्त व्यापार करार व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र आणि कुशल मनुष्यबळाच्या देवाणघेवाणीसाठी नवे मार्ग खुले करेल. पंतप्रधानांनी २०३० पर्यंत भारत-न्यूझीलंडमधील द्विपक्षीय व्यापार दुप्पट होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच पुढील १५ वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात २० अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा – महायुती सरकारमध्ये येताच ओमराजे निंबाळकर अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदेंकडे केल्या आठ प्रमुख मागण्या
“ही केवळ आर्थिक गुंतवणूक नसून भारताच्या विकास प्रवासात सहभागी होण्याची बांधिलकी आहे,” असे सांगत मोदी यांनी भारताला जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असल्याचे अधोरेखित केले. वाढता मध्यमवर्ग, डिजिटल परिवर्तन आणि मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधा विकास ही भारताच्या प्रगतीची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने ‘रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’ या तत्त्वांवर प्रशासन उभारले असून भारतात धोरणात्मक स्थिरता, राजकीय स्थैर्य आणि सातत्यपूर्ण आर्थिक वाढ असल्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांसाठी भारत सर्वोत्तम पर्याय ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतामध्ये स्मार्ट सिटी अभियानांतर्गत १०० शहरांमध्ये ८ हजारांहून अधिक प्रकल्प राबवले जात असल्याची माहिती देत मोदी यांनी न्यूझीलंडमधील कंपन्यांना शहरी वाहतूक, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन आणि इतर पायाभूत सुविधा क्षेत्रांत भागीदारीचे आमंत्रण दिले. तसेच न्यूझीलंडमधील विद्यापीठांनी भारतात आपले कॅम्पस सुरू करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्झन यांनी आयोजित केलेल्या विशेष स्नेहभोजनात मोदी म्हणाले की, लक्झन यांच्या गेल्या वर्षीच्या भारत दौऱ्यानंतर दोन्ही देशांतील संबंधांना नवी गती मिळाली आहे. तसेच ४० वर्षांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंड दौरा होत असल्याचे त्यांनी सांगितले. “माझ्या पूर्वसुरींनी काही महत्त्वाची कामे अपूर्ण ठेवली होती. ती पूर्ण करण्याची संधी मला मिळत आहे,” असे मोदी यांनी यावेळी म्हटले.





