जंतर-मंतरवरील आंदोलन ही केवळ सुरुवात; राज ठाकरेंचे वक्तव्य

Raj Thackeray | नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी तब्बल ४० दिवस चालवलेल्या आंदोलनावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “बऱ्याच वर्षांनंतर असे शांततापूर्ण आंदोलन पाहायला मिळाले. आंदोलक तरुणांवर जेव्हा लाठीचार्ज झाला, तेव्हा हे आंदोलन घराघरात पोहोचले. जंतर-मंतरवर झालेले हे आंदोलन ही केवळ सुरुवात असून येत्या काळात तरुणांचा हा राग आणखी जोरात बाहेर येईल,” असा इशारा राज ठाकरे यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत दिला.
राज ठाकरे म्हणाले, ज्यावेळी दिल्लीतील आंदोलक तरुणांना मारले, तेव्हा हे आंदोलन घराघरात पोहोचले. प्रत्येत आई-वडिलांना किंवा वृद्धांना आपल्या मुलाला मारले, असे वाटले. खरंतर जंतर-मंतरवर शांतपणे आंदोलन सुरू होते. सरकारने याची सुरुवात केली. मला वाटते, भाजपामधील हे अंतर्गत भांडण आहे. त्याच गोष्टी आता चव्हाट्यावर येत आहेत.
दगडांवरील ठशे आणि त्यावरून आधार कार्ड तपासणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, अशीही टीका राज ठाकरे यांनी केली. दहावी पास झाल्यानंतर पहिल्यांदा क्लासमध्ये प्रवेश घेतला जात आहे आणि क्लास ठरवतो की कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा. आज विद्यार्थी कॉलेजमध्ये न जाता, आठ-आठ तास क्लासमध्ये जाऊन बसत आहेत. मग कॉलेज काय करत आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या प्रश्नांवर महापौर रवि लांडगे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा
सर्वच कोचिंग क्लास वाईट नाहीत. पण आता याचा धंदा झाला आहे. नीटचा पेपर याच कोचिंग क्लासकडून फुटला. केंद्र सरकारने निलेकणी यांना आणले आहे, त्यांनी आधी या कोचिंग क्लासकडे लक्ष दिले पाहिजे. चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. क्लासमध्ये आठ-आठ तास बसल्यानंतर कॉलेजमध्ये हजेरी कशी काय लागते? असं राज ठाकरे म्हणाले.
आताच्या तरुण पिढीच्या हातात मोबाइल आहे. ते जगभरात काय चालले आहे हे पाहतात. त्यामुळे अनेकांना विदेशातील विद्यापीठात जाऊन शिक्षण घ्यावेसे वाटते. दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी विदेशात शिक्षणासाठी जात आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी पालक वर्षाला पाच लाख कोटी रुपये खर्च करतात. हा प्रचंड मोठा आकडा आहे. देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीनेही विदेशात शिक्षण घेतले आहे. जर शिक्षण मंत्र्यांच्या मुलीचा इथल्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नसेल तर सामान्य पालकांचा का असेल? असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.





