हाथरस पीडितेवर मध्यरात्रीच पोलिसांनी अंत्यसंस्कार उरकले
हाथरस – उत्तर प्रदेशातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेवर मध्यरात्री २.४०च्या सुमारास पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे ग्रामस्थ आणि या पीडितेच्या नातेवाईकांचा विरोध असतानाही पोलिसांनी हे अंत्यसंस्कार उरकले. त्यामुळे तेथे पोलिसांविरोधात संताप पसरला आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता. त्यावेळी या नराधमांनी तिची जीभही छाटली होती. या पीडितेवर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी रात्री तिचा मृतदेह हाथरसमधील बुलगाडी गावात आणला. परंतु गावकरी आणि तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. त्यानंतरही पोलीस त्यांचा विरोध झुगारून अंत्यसंस्कारासाठी रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत होते. त्यावेळी काही ग्रामस्थ रुग्णवाहिकेसमोर झोपले, तर काही रुग्णवाहिकेला लटकत आक्रोश करत होते. त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने बाजूला हटवले. यावेळी पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात झटापटही झाली. नंतर २.४०च्या सुमारास कोणतेही विधी न करता आणि तिच्या नातेवाईकांच्या गैरहजेरीत पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. पोलिसांचा हा प्रकार म्हणजे क्रूरतेचा कळस आहे, अशी टीका उत्तर प्रदेश काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने केली आहे. या प्रकरणावर मोदी गप्प का, असा सवालही सोशल मीडियावर विचारला जात आहे.