‘स्वच्छ सर्वेक्षण-2018’वर महाराष्ट्राची छाप
पहिल्या शंभरात राज्यातील 28 शहरे
मुंबई – स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या (अमृत शहरे) स्पर्धेत राज्यातील 28 शहरांनी पहिल्या 100 क्रमांकामध्ये स्थान मिळविले आहे. तर एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागात राज्यातील 58 शहरांनी स्थान मिळविले आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2018ची क्रमवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील शहरांनी आपली छाप पाडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली होती. या अभियानाअंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण 2018 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 4 जानेवारी 2018 ते 10 मार्च 2018 या कालावधीत देशातील 4203 शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील 43 अमृत शहरांनी, तर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 217 शहरांनी सहभाग घेतला होता. राज्याला यापूर्वीच स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये देशातील सर्वोकृष्ट दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यासह विविध विभागातील एकूण 52 पारितोषिकांपैकी सर्वाधिक एकूण दहा पारितोषिके जाहीर झाली आहेत. देशातील स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मुंबई शहरास, तर घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई शहराने बाजी मारली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील नऊ शहरे स्वच्छ ठरली असून यातील सहा शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे.
तर तीन शहरांना विभागस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये नागपूर शहराला नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा, परभणीला नागरिक प्रतिसादमध्ये, भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहराचा, भुसावळ शहरास गतिमान लहान शहर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सासवडला पुरस्कार जाहीर
विभागस्तरीय तीन पुरस्कारांवर राज्याने नाव कोरले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सासवड या शहराला नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराला पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा पुरस्कार, तर नागरिक प्रतिसादाच्या बाबतीत दिला जाणारा पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील शेंदुरजना घाट या शहराला जाहीर करण्यात आला आहे.