माझ्या विधानाचा विपर्यास केला; असेच होत राहिले तर बोलणेही कठीण – गडकरी
नागरी बँकांच्या कार्यक्रमात जे काही बोललो त्यात निवडणुकीचा कोणताही संदर्भ नव्हता. बँकेच्या कार्यक्रमातील विधानाचा राजकारणाशी हेतूत: संदर्भ जोडण्यात आला. यापूर्वीही असेच झाले आहे. असे वारंवार होत राहिले तर बोलणेच कठीण होईल, अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ आणि जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केलेल्या विधानासंदर्भात रविवारी सारवासारव केली. आगामी लोकसभा निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणार असून, पंतप्रधानपदाचा मी स्पर्धक नाही, असेही त्यांनी सांगितले.
‘विजय मिळाला की त्याचे श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे येतात. पराभव मात्र अनाथ असतो. तुम्हाला यश मिळाले की श्रेय घेण्याची स्पर्धा लागते. अपयशाची जबाबदारी घेण्याची वृत्ती नेतृत्वात असली पाहिजे,’ असे वक्तव्य गडकरी यांनी शनिवारी येथील एका कार्यक्रमात केले होते. या विधानावरून चर्चा सुरू झाल्यानंतर गडकरी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन विधानाबाबतचा खुलासा केला. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे आणि पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले या वेळी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले,‘नागरी बँकांच्या कार्यक्रमात मी जे काही बोललो त्यात निवडणुकीचा कोणताही संदर्भ नव्हता. माझ्या वक्तव्याची मोडतोड करण्यात आली. यापूर्वीही सातत्याने असे झाले आहे. वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत असेल तर बोलणेच कठीण आहे.’ आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असून, निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमताने सत्ता मिळेल, मात्र पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये आपण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.