ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महायुतीच्या जागावाटपात भाजपकडून १५ जागा मिळवण्यात यश

भाजपच्या वाट्याला तूर्त २७ जागा; पालघरच्या जागेचा तिढा अद्याप कायम

मुंबई : एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपद देऊ केले असले तरी त्यांना निवडणुकीच्या जागावाटपात भाजप आपला खरा रंग दाखवेल व त्यांना फारशा जागा सोडणार नाही, हा विरोधकांचा दावा सपशेल खोटा ठरवत अखेर शिंदे यांच्या शिवसेनेने नाशिक, ठाणे, कल्याणसह मुंबईतही भाजपइतक्याच जागा घेतल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वी १६ जागा मिळणार असे म्हटले होते. पालघरच्या जागेचा तिढा अद्याप कायम असला तरीही शिंदे यांनी १५ जागा भाजपकडून घेण्यात यश मिळवले आहे. बुधवारी शिंदे यांच्या शिवसेनेने नरेश म्हस्के (ठाणे), श्रीकांत शिंदे (कल्याण) आणि हेमंत गोडसे (नाशिक) या तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

महायुतीत गेले दोन-अडीच आठवडे नाशिक, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, कल्याण आदी जागांचा तिढा सुटता सुटत नव्हता. यातील किती जागा भाजपला जाणार याबाबत अनिश्चितता होती. त्यात भाजपने सिंधुदुर्ग-रत्नागिरी ही जागा स्वतःकडे खेचून घेतल्याने शिंदे यांना आता एक अंकी जागाच मिळतील, असा दावा विरोधकांकडून केला जात होता. बुधवारीही शिवसेना (उबाठा) पक्षाने शिंदे यांच्या शिवसेनेला १२-१३ जागाच मिळाल्याचे म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. प्रत्यक्षात मात्र पक्षफुटीनंतर १३ खासदार पाठीशी असताना शिंदे यांनी १६ जागा मिळवत महायुतीतील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

असे असले तरीही जागांचा हा तिढा शेवटच्या टप्प्याच्या मतदानाचे अर्ज भरण्यास दोन दिवस उरलेले असेपर्यंत सुरू राहिल्याने आता प्रचारात आघाडी घेण्याचे आव्हान शिंदे यांच्या शिवसेना पक्षासमोर असणार आहे. दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, नाशिक या मतदारसंघांमध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाने २७ मार्च रोजी म्हणजे जवळपास एक महिन्यापेक्षा अधिक काळापूर्वीच आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवारांना प्रचारासाठी तुलनेने खूपच अधिक वेळ मिळाला आहे. मुंबई व ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक त्यामुळे अधिक जोशात आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांचे निवडणूक व्यवस्थापन व मोदी यांची जादू यामुळे निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास शिंदे यांच्या कार्यकर्त्यांशी बोलले असता दिसून येत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील तीन आमदारांच्या बळावर नाशिकच्या जागेबाबत भाजपने आपला अट्टहास कायम ठेवला होता. हेमंत गोडसे यांच्याबाबतची नाराजी आणि सर्वेक्षण अहवालाचे दाखले देत भाजपने या जागेवर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे नाव पुढे केले. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पसंतीचा दाखला देण्यात आला. तरीही नाशिकच्या जागेचा निर्णय होत नसल्याने भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली. भुजबळ यांच्या माघारीने गोडसे यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, त्याचवेळी जिह्यातील दुसरे इच्छुक अजय बोरस्ते यांनी उचल खाल्ल्याने नाशिकच्या उमेदवारीबाबत गूढ निर्माण झाले होते. हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शक्तिप्रदर्शन करत तसेच अनेकदा भेटीगाठी घेत नाशिकच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. गोडसे यांच्या या प्रयत्नांना यश आले असून मुख्यमंत्री शिंदे यांनी आज त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

दक्षिण मुंबईची जागा भाजपला सुटणारच असा भाजप कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर काही विद्यमान मंत्र्यांनाही विश्वास होता. या जागेसाठी भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा असे दिग्गज इच्छुक होते. तरीही शिंदे यांनी ही जागा स्वतःच्या पदरात पाडून घेतली. या जागेवर पहिल्यांदाच प्रमुख लढत ही दोन मराठी उमेदवारांमध्ये होणार आहे.

ठाण्याच्या जागेवरही भाजपने खूप आग्रही दावा केला होता. दिवंगत नेते आनंद दिघे यांनी कल्याणची जागा शिवसेनेकडे खेचून घेतल्यानंतर पहिल्यांदाच कल्याणच्या बदल्यात ठाण्याची जागा मिळवण्याची संधी भाजपला मिळाली असल्याचे भाजपचे नेते व कार्यकर्ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे यांचा मतदारसंघ व घर दोन्ही ज्या लोकसभा मतदारसंघात येतात ती जागा भाजपला गेल्यास शिंदे यांच्यासाठी ती मोठीच नामुष्की ठरण्याची शक्यता होती. मात्र ठाण्याची जागादेखील शिंदे यांनी मिळवली व त्या ठिकाणी त्यांचे विश्वासू नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे.

आता पालघर वगळता सर्व जागांवरील उमेदवार महायुतीकडून जाहीर झाले असल्याने प्रचारात जोरदार रंगत भरणार हे स्पष्ट आहे. मुंबई व ठाण्यामध्ये प्रचाराच्या दरम्यानही इतर पक्षांमधील अनेक नेते भाजप व शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचेही महायुतीतील नेते ठामपणे सांगत आहेत. येत्या दोन दिवसांतच काँग्रेसमधून काढून टाकलेले संजय निरुपम हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याचा महायुतीला सकारात्मक परिणाम होईल की नकारात्मक ते मतमोजणीनंतरच समोर येईल.

आता दक्षिण मुंबईत यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई व उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर अशी धनुष्यबाण व मशाल यांच्यात जोरदार लढाई होणार आहे. ईशान्य मुंबईत शिवसेना (उबाठा) पक्षाचे संजय दिना पाटील व भाजपच्या मिहीर कोटेचा यांच्यात लढत होणार असून, उत्तर मध्यमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड व भाजपचे उज्ज्वल निकम यांच्यात आणि उत्तर मुंबईत काँग्रेसचे भूषण पाटील विरुद्ध पीयूष गोयल यांच्यात लढत होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button