केवळ तीन लोकांकडून देश चालवला जाऊ शकत नाही – राहुल गांधी
राहुल गांधी: सर्व विरोधक लवकरच एकवटतील
नवी दिल्ली – कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरच सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. केवळ तीन लोकांकडूून देश चालवला जाऊ शकत नाही. मोदी, शहा आणि भागवत यांना ते लवकरच कळेल, असे राहुल यांनी म्हटले.
पुढील सहा महिने ते वर्षभराच्या कालावधीत सगळे विरोधक एकवटतील. त्यावेळी मोदी, शहा आणि भागवत यांना भारताची ताकद समजेल. जनतेकडून देश चालवला जातो याची जाणीव त्यांना होईल, असे राहुल येथे इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) अधिवेशनात बोलताना म्हणाले.
देशात सध्याच्या स्थितीत प्रत्येक जण बोलायला घाबरतो. त्याला सत्तारूढ भाजपचे खासदारही अपवाद नाहीत. केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ऐकले जाते, असा आरोपही त्यांनी केला. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताकडे पूूर्ण दुर्लक्ष करत आहे. याउलट, केवळ 15 उद्योगपतींना तब्बल 2.5 लाख कोटी रूपयांची कर्जमाफी दिली गेली. देशातील बॅंकांच्या बुडित कर्जाची रक्कम 10 लाख कोटी रूपयांपर्यंत पोहचली आहे, असा दावा यावेळी राहुल यांनी केला.