ज्यांच्या सभा दुसऱ्याच्या जीवावर, त्यांनी दुसऱ्यावर टीका करू नये, मनीषा कायंदेंची मनसेवर टीका
मुंबई: ‘ज्यांच्या सभाच दुसऱ्याच्या जीवावर चालतात त्यांनी दुसऱ्यावर टीका करू नये. संभाजीनगरच्या सभेसाठी कोणी फंडिंग केलं, कुठून माणसं आली, याची खबर आमच्याकडे आहे’, यामुळे यासारखे मनसेचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी मनसेवर केला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेच्या होऊ घातलेल्या सभेच्या टीझरवर टीका करताना शिवसेनेला ‘चोरसेना’ असे संबोधले होते. याबाबत कायंदे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.
- वारंवार महाराष्ट्राची आणि मुख्यमंत्र्याची बदनामी सहन केली जाणार नाही – मनीषा कायंदे
भाजपा खासदार नवनीत राणा यांचे लिलावती रुग्णालयातील एमआरआय करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. ‘लिलावती रुग्णालयात करण्यात आलेले स्कॅन आहे की स्कॅम आहे, सकाळपासून सर्व दिनचर्या व्हायरल करणाऱ्या राणा यांचे रिपोर्ट का व्हायरल करत नाहीत’, असा सवाल मनीषा कायंदे यांनी केला. राणा यांचा खरच एमआरआय झाला आहे का, याची चौकशी करण्याची मागणी करत शिवसेनेच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे फोटो रुग्णालयाच्या संगनमताने व्हायरल झाले असावे किंवा दबावात करायला भाग पाडलं आहे, असा संशय व्यक्त करत यासाठी रुग्णालय प्रशासनाला त्यांनी जबाबबदार धरले आहे. तसेच, वारंवार मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राची सुरु असलेली बदनामी शिवसैनिक खपवून घेणार नाही, असा इशारा देखील कायंदे यांनी दिला आहे.
राजद्रोहाच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून यावर बोलताना कायंदे यांनी देशभरात अनेक केसेस दाखल करण्यात आल्या होत्या यातून कोणावर अन्याय होत नाही ना? अनावश्यक कायदा लादला तर जात नाही ना, यासारखी मते आणि त्यातील दुरुस्त्या कायदे तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आल्या होत्या. यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला असून ही कायदेशीर बाब असल्याने पक्ष म्हणून आपण मत व्यक्त करणार नसल्याचे त्यांनी सांगितलं.
- शिवसेना काम करणारा पक्ष आहे – मनीषा कायंदे
डोंबिवली जवळील देसलेपाडा जवळील खदानीत ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना चित्रपट प्रमोशनमधून वेळ काढा असं भावनिक पत्र दिले होते. याबाबत बोलताना त्यांनी जिल्ह्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्ण लक्ष आहे. पाण्याची टंचाई महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असून त्यावर उपाययोजना सरू आहेत. नाशिक पालघरमधील पाणी टंचाईची पाहणी करत आदित्य ठाकरे यांनी स्वत: जाऊन त्वरित कारवाई केली आहे.
पाणी समस्येवर बारीक लक्ष आहे. देसलेपाडा सारख्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत. हा उन्हाळ्याचा काळ आहे पाणी हा ज्वलंत प्रश्न आहे. यासाठी सगळेच झटत आहेत. पालकमंत्र्यांचे लक्ष नाही असा आरोप करणे सोपं आहे. मात्र काम करून दाखवले पाहिजे आणि शिवसेना काम करणारा पक्ष आहे. राजकारणातील भाषेची पातळी घसरत असून यावर बोलताना कायंदे यांनी आपण सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो, यामुळे प्रत्येकाने बोलताना तारतम्य बाळगून बोलले पाहिजे. सगळ्यांनी नियमाचे पालन केले पाहिजे. आपण कोण, आपलं पद काय, याचा विचार करून बोललं पाहिजे, ही बाब सर्वांसाठी लागू असल्याचे कायंदे यांनी सांगितले.