‘माझ्या उमेदवारीमुळे भाजपाला फरक पडत नसता तर २०२२ मध्ये..’; वसंत मोरेंचं विधान चर्चेत
पुणे | वसंत मोरे अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले, तर त्यानं आम्हाला फारसा फरक पडणार नाही, असं विधान भाजप नेते व पुण्यातील आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यावरून वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी होऊल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
वसंत मोरे म्हणाले की, पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात आम्ही लोकांकडून मत जाणून घेतोय. लोक बऱ्याचदा काही पर्याय सुचवतात. पण ते निवडताना पुण्याचं हित झालं पाहिजे त्या दृष्टीने पावलं टाकतोय. मी मविआकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. कारण इथे फक्त निवडणुका लढायच्या नाहीयेत तर जिंकायच्याही आहेत. त्यामुळे जिंकण्यासाठी लढायचं असेल तर योग्य ट्रॅकवर असणं गरजेचं आहे. मी योग्य ट्रॅकवरच असून त्यात यशस्वी होईन असं मला वाटतं.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय, चार तरुणींची सुटका
आजपासून निवडणुकीला ५५ दिवस आहेत. त्यामुळे कमी दिवस वगैरे काही नाही. ज्या दिवशी वसंत मोरे रिंगणात उतरेल, त्या दिवशी पुणे लोकसभेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत येईल. तेव्हा आपण निवडणूक कशी एकतर्फी होईल हे पाहू. माझी वेळ नक्कीच चुकलेली नाही. मी वेळ घेतोय. योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईन, असं वसंत मोरे म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांच्या त्या विधानाबाबत विचारणा केली असता वसंत मोरेंनी त्यावर खोचक टिप्पणी केली. ते म्हणाले, तसा फरक पडला नसता तर २०२२ ला ते मला म्हणालेच नसते की तुम्ही भाजपात या. मॅरिएट हॉटेलमध्ये मला सकाळ समूहानं पुरस्कार दिला होता. तेव्हा उघडपणे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं की तुम्ही भाजपात या, तुम्ही निवडून याल. मी तेव्हाच त्यांना सांगितलं की माझ्या तिन्ही टर्म भाजपाविरोधात झाल्या आहेत आणि तिन्ही वेळा मी यशस्वी झालो आहे. त्यामुळे माझ्या उमेदवारीनं काय फरक पडेल हे पुणेकर त्यांना दाखवेल, असंही वसंत मोरे म्हणाले.