भीमा नदीपात्रात आढळला ‘त्या’ अपहृत व्यक्तीचा मृतदेह
पिंपरी l प्रतिनिधी
जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीचे खून करण्याच्या उद्देशाने चार जणांनी मिळून अपहरण केले. हा प्रकार रविवारी (दि. 13) रात्री साडेनऊ वाजता खेड तालुक्यातील कोयाळी मधील काळे वस्ती येथे घडला. अपहरण झालेल्या त्या व्यक्तीचा मृतदेह निकम वस्ती, कोयाळी येथील भीमा नदी पात्रात सापडला आहे.
लक्ष्मण यशवंत शिंदे (वय 31) असे अपहरण आणि खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी सुनीता लक्ष्मण शिंदे (वय 27, रा. काळे वस्ती, कोयाळी, ता. खेड, पुणे. मूळ रा. देवणी, ता. उदगीर, लातूर) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील जयवंत पांढरे, कोंडीबा लहू काळे, संतोष उर्फ पिंटू लहू काळे, शिवाजी पांडुरंग कोळेकर (सर्व रा. काळे वस्ती, कोयाळी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती लक्ष्मण शिंदे आणि आरोपी यांचे 6 एप्रिल 2021 रोजी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी 13 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता लक्ष्मण शिंदे यांना त्यांच्या घरासमोरून दुचाकीवर बसवून कोंडीबा काळे याच्या घरी नेले. तिथे आरोपींनी लक्ष्मण काळे यांचा खून करण्यासाठी अपहरण करून त्यांचा खून केला असल्याची फिर्यादी यांना खात्री असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी सुनील पांढरे, कोंडीबा काळे यांना अटक केली. कोंडीबा काळे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून लक्ष्मण शिंदे यांचा खून केला असून मृतदेह निकम वस्ती येथे भीमा नदीच्या पात्रात पुरला असल्याचे सांगितले. पोलिसांनी शोध घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. या गुन्ह्यात खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबाबत कलमवाढ करण्यात आली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.