जम्मू-काश्मीरचा ऐतिहासिक विजय; पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं

Ranji Trophy Final 2026 | रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीरने इतिहास रचत पहिल्यांदाच किताब पटकावला. दिग्गजांनी भरलेल्या कर्नाटक संघाविरुद्ध खेळताना जम्मू-काश्मीरने 67 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा ऐतिहासिक विजय मिळवला. पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या जोरावर त्यांनी रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं.
जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात दमदार फलंदाजी करत 584 धावांचा डोंगर उभारला. शुभम पंडीरने 121 धावांची शानदार शतकी खेळी साकारली, तर हसनने 88 धावा जोडल्या. कर्णधार पारस डोगरा आणि कन्हैया वाधवन यांनी प्रत्येकी 70 धावांचे योगदान दिले. साहिल लोत्राच्या 72 धावांमुळे संघ मजबूत स्थितीत पोहोचला.
हेही वाचा : इस्रायलचा इराणच्या राजधानीवर हल्ला; इराणमध्ये आणीबाणी जाहीर
कागदावर मजबूत वाटणारी कर्नाटकची फलंदाजी जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांसमोर कोसळली. आकिब नबीच्या भेदक गोलंदाजीसमोर केएल राहुल, मयंक अग्रवाल, देवदत्त पडिक्कल आणि करुण नायर यांसारखे अनुभवी खेळाडू अपयशी ठरले. जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांनी कर्नाटकला स्थिरावण्याची संधीच दिली नाही.
कर्नाटकचा पहिला डाव 293 धावांवर आटोपला आणि जम्मू-काश्मीरला 291 धावांची मोठी आघाडी मिळाली. फॉलोऑन देण्याची संधी असतानाही जम्मू-काश्मीरने पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावातही त्यांनी आपली लय कायम ठेवत चौथ्या दिवसाअखेर 4 बाद 186 धावा केल्या. पहिल्या डावातील भक्कम आघाडी आणि सर्वांगीण कामगिरीच्या जोरावर जम्मू-काश्मीरने रणजी ट्रॉफी जिंकत भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला.




