वृक्षवल्ली’ उपक्रमातून एमआयटी आळंदीच्या विद्यार्थ्यांकडून ७०० जांभूळ वृक्षांचे रोपन
वनमहोत्सवानिमित्त वृक्षारोपण; एनएसएस स्वयंसेवकांचा पर्यावरण संवर्धनासाठी उत्स्फूर्त सहभाग

आळंदी/वाघोली | प्रतिनिधी
वनमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने ‘गिव्ह मी ट्रीज ट्रस्ट’च्या सहकार्याने ‘वृक्षवल्ली’ या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत केसनांद (ता. हवेली) येथील वनविभागाच्या सुमारे दोन एकर जागेवर तब्बल ७०० देशी जांभूळ वृक्षांची लागवड केली.
या उपक्रमात महाविद्यालयातील ३५ एनएसएस स्वयंसेवक, पाच प्राध्यापक आणि गिव्ह मी ट्रीज ट्रस्टचे दहा सदस्य अशा एकूण ५० जणांनी उत्साहाने सहभाग घेतला. वृक्षारोपणापूर्वी स्वयंसेवकांनी आणि ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी जवळपास चार तास श्रमदान करून जमीन लागवडीसाठी तयार केली. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने देशी जांभूळ रोपांची लागवड करण्यात आली.
हेही वाचा – “पंतप्रधान मोदींमुळेच पुतिन यांनी युक्रेनवरील अणुहल्ला रोखला”; पोलंडच्या मंत्र्याचा मोठा दावा!

पर्यावरणाचा समतोल राखणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि हरित आच्छादन वाढविणे या उद्देशाने दीर्घकाळ टिकणारी व उच्च जगण्याचा दर असलेली देशी जांभूळ प्रजाती निवडण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे, डॉ. शरद कदम, डॉ. सुनील महाजन आणि डॉ. राहुल बाराथे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत पर्यावरण रक्षणासाठी युवकांनी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. एनएसएस कार्यक्रम अधिकारी अरविंद वागस्कर यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व, पर्यावरणीय शाश्वतता आणि निसर्गसंवर्धनात युवकांचे योगदान यावर मार्गदर्शन केले.
वृक्ष संगोपन व संवर्धनाची शपथ
‘गिव्ह मी ट्रीज ट्रस्ट’चे कार्यक्रम अधिकारी सिद्धार्थ गायकवाड यांनी संस्थेच्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती देत स्वयंसेवकांना वृक्षसंवर्धनासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी सर्व स्वयंसेवकांनी लागवड केलेल्या रोपांचे संगोपन व संरक्षण करण्याची शपथ घेत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केला.





