‘आयोध्येचा सातबाराही एखाद्या उद्योगपतीला दिला जाईल’; ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल
मुंबई : राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण हा सध्या चर्चेचा आणि वादाचा विषय बनला आहे. यावरून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राममंदिराचं निमंत्रण हा एका पक्षाचा विषय झालाय. हा कार्यक्रम रामलल्लासाठी नाही, तो भाजपचा कार्यक्रम आहे, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, छत्तीसगडचे जंगल तरी राहून द्यावं. प्रभू श्री राम जंगलात वनवास भोगल्यानंतर अयोध्येत माघारी परतले. जंगलात प्रभू श्री राम आणि बाकीच्या देवांनीही वास्तव केलं आहे. पण, आता जंगल तोडून एखाद्या उद्योगपतीला देण्याचा घाट घातला जातोय. त्याविरोधात छत्तीसगडचे आदिवासी संघर्ष करत असून त्यांना तुरुंगात टाकलं जातंय.
हेही वाचा – Ratan Tata Birthday : रतन टाटा यांच्या संपत्तीचा आकडा किती? जाणून घ्या..
देशात सगळं एकाच व्यक्तीला दिलं जात आहे. एकदिवशी अयोध्येचा सातबाराही एखाद्या उद्योगपतीला दिला जाईल. प्रत्येक कामात व्यापार आणि व्यावहार आहे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली.
आमंत्रणाचं राजकारण देशात कधीही झालं नव्हतं. संसदेचं उद्घाटन झाल्यावरही हाच प्रकार झाला. आता राम मंदिराच्याबाबतही हेच सुरू आहे. हे सगळे सोहळे एका पक्षाचे आहेत. या सोहळ्यांना राष्ट्रीय स्वरूप नाही. देशाच्या स्वातंत्रलढ्यात कवडीभर योगदान नसलेले उद्घाटन करतात. अयोध्येच्या संघर्षात योगदान नसलेले सगळ्यात पुढे आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.