महायुतीत मंत्रिपदाचं समीकरण काय? देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Devendra Fadnavis :राज्यात नवं सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता अवघ्या राज्याचं लक्ष मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाकडे लागलं आहे. कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे मिळणार हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी तिन्ही पक्षांमधील इच्छुकांची संख्या लक्षात घेता सर्वांचे समाधान करण्याची तारेवरची कसरत नेतेमंडळींना करावी लागणार आहे.
९१व्या घटना दुरुस्तीनुसार विधानसभेच्या एकूण संख्याबळाच्या १५ टक्के मंत्रिमंडळाचा आकार असण्याची तरतूद करण्यात आली. यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह ४३ जणांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्याने तीन जागा भरल्या गेल्या आहेत. मंत्रिमंडळात आणखी ४० जणांचा समावेश करता येऊ शकेल. दरम्यान, कोणाला मंत्रिपदे द्यायची याबाबतचं सुत्र ठरलं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आम्ही तिघांनी ठरवलं आहे. एकनाथ शिंदे त्यांचे मंत्री ठरवणार, आम्ही आमचे आणि अजित पवार त्यांचे मंत्री ठरवणार. तिघांनी मिळून हे ठरवलं आहे की आपल्या मंत्र्यांचं मुल्यांकन करायचं. मुल्यांकनाच्या आधारावर कोणाला पुन्हा संधी द्यायची आणि नाही हे ठरवणार”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – विधानसभा अध्यक्षपदी नार्वेकरांना पुन्हा संधी?
२०१४ च्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीसांनी ज्येष्ठ मंत्र्यांना संधी दिली होती. त्याची पुनर्रावृत्ती होणार का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते देवेंद्र फडणवीस म्हणाले, “यावेळी अनुभवी लोक आणि नवीन लोकांचं मिश्रण असणार आहे.”
छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावीत, दादा भुसे, गुलाबराव पाटील आदी ज्येष्ठ किंवा वर्षानुवर्षे मंत्रीपदे भूषविलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात आपला समावेश व्हावा, असे वाटते. पण पक्ष नेतृत्वाकडून अद्याप काहीच सूचित करण्यात आलेले नाही. दोन किंवा तीनपेक्षा जास्त वेळा निवडून आलेल्या तिन्ही पक्षांमधील आमदारांना आपला मंत्रिमंडळात समावेश व्हावा, असे वाटते.
शिवसेना शिंदे गटातही इच्छुकांची संख्या लक्षात घेता सर्वांचे समाधान करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कसोटी लागणार आहे. शिंदे यांच्याबरोबर बंडात सहभागी झालेल्या दहा जणांना गेल्या सरकारमध्ये मंत्रीपदे मिळाली. उर्वरित आमदारांनाही आता आपला मंत्रिमंडळात समावेश व्हावा, असे वाटते. गेल्या वेळी संधी मिळाली त्यांना यंदा वगळून आमच्यासारख्यांना मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशी जाहीरपणे भूमिका भरत गोगावले यांनी मांडली. तर मी चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो असल्याने यंदा मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा ठाण्यातील प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.