आम्ही संघर्षातून मोठे झालोय..भोरमध्ये राष्ट्रवादीने नगराध्यपदाचा उमेदवार फोडल्यानंतर उदय सामंतांच प्रत्युत्तर…

पुणे : राज्यातील महायुती सत्तेत एकत्र असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सतत तणाव वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या सर्वच पक्षाचे नेते स्थानिक नेते आपल्याकडे आणण्यात मग्न झाले आहेत. त्यामुळे महायुतीत खटके उडत आहेत. दरम्यान, भाजप–शिवसेनेतील वाद निवळत असतानाच अजित पवार गटाने मात्र भोरमध्ये शिवसेनेला अनपेक्षित धक्का दिला.
नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतून अर्ज दाखल केलेल्या एका उमेदवाराने अचानक राष्ट्रवादीत प्रवेश केला. हा प्रवेश थेट राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत झाल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घडामोडीवर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीच्या या निर्णयावर टीका केली आहे.
हेही वाचा – पिंपरी–चिंचवडमध्ये घर कामगार- कष्टकरी महिलांचा होणार सन्मान!
“उमेदवार पळवण्याच्या राजकारणाला जनता योग्य उत्तर देईल. आमचा पक्ष एखादा उमेदवार गेला म्हणून कोलमडत नाही. शिवसेना संघर्षातून उभी राहिलेली आहे. अशा किरकोळ हालचालींनी आम्ही डळमळणार नाही,”अश्या शब्दात सामंत यांनी सुनावले.
एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच दिल्लीत अमित शहा यांची घेतलेली भेटही चर्चेत असताना सामंत यांनी यावरही भाष्य केले. ते म्हणाले, “एनडीएमध्ये एकनाथ शिंदे हे तिसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रीय नेते मानले जातात. त्यामुळे त्यांची ही भेट तक्रारींसाठी नव्हे, तर निर्णयासाठी असते. शिंदे हे समस्यांचे निराकरण करणारे नेतृत्व आहे,” असे ते म्हणाले.
महायुतीत कुणीही अनावश्यक कलह निर्माण करू नये, अशी भूमिका सर्व वरिष्ठ नेत्यांची असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. “मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब यांच्यातील समन्वय मजबूत आहे. भाजप आणि शिवसेनेत एकमेकांच्या पक्षातील नेत्यांचे प्रवेश टाळण्याची स्पष्ट सूचना नेतृत्वाने दिल्या आहेत. आमची नाराजीसुद्धा आम्ही थेट शिंदे साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली. त्यातून मार्गही निघाला,” असे त्यांनी सांगितले.





