To The Point : छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकरणात महाविकास आघाडीचा ‘सेल्फ गोल’
शिल्पकार अनिल सुतार यांनी एका वाक्यात विषय संपवला : म्हणाले... ज्यांना शिल्पकलेचे ज्ञान नाही.. त्यांच्या टिकेवर काय बोलणार?
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच १४० फूटांचा पूर्णाकृती पुतळा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ उभारण्याचे काम सुरू आहे. या पुतळ्याच्या मोजडीला भेगा पडल्याचा मुद्दा उपस्थित करीत महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी खळबळ उडवून दिली होती. मात्र, प्रख्यात शिल्पकार अनिल सुतार यांनी ‘‘ज्यांना शिल्पकलेचे ज्ञान नाही..’’ त्यांनी केलेले टिकेला काय उत्तर देणार? असा एका वाक्यात विषयावर पडदा टाकला आहे. परिणामी, छत्रपतींच्या अस्मितीचे राजकीय भांडवल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड मविआचा ‘सेल्फ गोल’ झाला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा पिंपरी-चिंचवडमध्ये व्हावा. यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. हा पुतळा महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून साकारला जात आहे. मोशीतील ज्या प्रस्तावित जागेत हा पुतळा उभारला जातो आहे. पुतळ्याचे काम मार्च-२०२० मध्ये सुरू झाले. हा पुतळा भोसरी विधानसभा क्षेत्रामध्ये येतो. पुतळा उभारण्याची संकल्पना लांडगे यांची आहे. पण, लांडगे भाजपाच्या तिकीटावर निवडून आले आहेत. किंबहुना, शहरातील भाजपाचा ‘स्ट्राँग’ नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुतळ्याच्या कामावरुन भाजपा किंबहुना महायुतीला कोंडीत पकडण्याची रणनिती महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी आखली आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
दरम्यान, शहरातील प्रसारमाध्यमांतील काही मातब्बर पत्रकारांनी छत्रपती संभाजी महाराज पुतळा आणि त्याच्या कामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे संशयाची सूई आणखी तीक्ष्ण झाली. तसेच, ‘मेन स्ट्रिम’ मिडियातील पत्रकारांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले. त्यामागील ‘हेतू’ची शहानिशा केली आणि व्रतस्थ पत्रकारितेचा आदर्श घालून दिला. या प्रकरणामुळे शहरातील वातावरण कुलषित होणार नाही, याची काळजी घेतली.
विश्वव्यापी आणि विश्वासार्ह माध्यम समुह असलेल्या ‘टाईम्स ग्रुप’च्या एका युवा पत्रकाराने छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा ज्या कार्यशाळेत बनवला जातो. त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. पद्मश्री व पद्मभूषण शिल्पकार राम सुतार यांची कार्यशाळा उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद येथे आहे. या कार्यशाळेत संबंधित पत्रकाराने राम सुतार यांचे चिरंजीव प्रतिथयश शिल्पकार अनिल सुतार यांची मुलाखत घेतली. त्यावेळी मालवण येथील घटना आणि पिंपरी-चिंचवडमधील पुतळ्याबाबत वस्तुस्थिती काय आहे? हे संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडले.

… असा आहे घटनाक्रम
दिवस पहिला- शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट :
सुरूवातीला पुतळ्याच्या मोजडीला भेगा पडल्याचे वृत्त सायंकाळी प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल करण्यात आले. मालवणमधील पुतळा प्रकरण चर्चेत असल्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये तशीच परिस्थिती निर्माण होईल, असा दावा करण्यात आला. विषयाचे गांभीर्य लक्षात आल्याने महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी प्रसारमाध्यमांना अधिकृत खुलासा आणि प्रेसनोट सादर केली. किंबहुना, ‘‘चुकीच्या वृत्तांवर विश्वास ठेवू नका’’ असे आवाहन केले.
दिवस दुसरा: शनिवार, दि. ३१ ऑगस्ट :
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पुतळ्याचे काम जिथे सुरू आहे आणि पार्ट जिथे ठेवलेले आहेत, तिथे सकाळी भेट दिली. ‘फेसबूक लाईव्ह’ केले आणि महायुतीच्या स्थानिक आमदारांना खडे बोलही सुनावले. ‘‘मला राजकारण करायचे नाही’’असा दावा करताना ‘‘आयुक्तांनी भाजपाचे प्रवक्ते होवू नये’’ असा परस्परविरोधी सल्लाही दिला.
याच दिवशी दुपारी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, भोसरीतील इच्छुक उमेदवार अजित गव्हाणे, सुलभा उबाळे आणि रवि लांडगे यांच्या पिंपरीतील इच्छुक उमेदवार सुलक्षणा शिलवंत प्रमुख उपस्थित होत्या. या पत्रकार परिषदेत अनेक आक्षेप नोंदवण्यात आले.
दिवस तिसरा : रविवार, दि. १ स्पटेंबर :
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पुन्हा मोशी येथील पुतळ्याच्या ठिकाणी भेट दिली. तेथील साफसफाई करण्याबाबत महापालिका प्रशासनाला आवाहन केले. ‘‘आम्हाला या मुद्यावर राजकारण करायचे नाही, पण प्रशासनाने कार्यवाही केली नाही, तर तीव्र आंदोलन करु’’ असा इशारा दिला. विशेष म्हणजे, महाराजांच्या मोजडीला पाद्यपुजन करुन ‘सेंटिमेंट’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, भाजपाच्या आमदारांनी पाद्यपुजन केले होते. हे सांगायलाही कामठे विसरले नाहीत.
दिवस चौथा : सोमवार, दि. २ सप्टेंबर :
शहरातील शिवप्रेमी, शंभू प्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहेत, असा मॅसेज शहरात व्हायरल करण्यात आला. नियोजनाप्रमाणे भाजपा किंवा महायुतीविरोधी विचारांच्या संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला.

वरील सर्व घटनाक्रम पाहाता तुषार कामठे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राजकीय ‘षडयंत्र’ रचले जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.





