‘मोदींचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातून असेल’; संजय राऊतांचा मोठा दावा

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नागपूरच्या रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली. यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वारसादाराबद्दल भाष्य केले आहे. नरेंद्र मोदी यांचा वारसदार कोण असेल? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. यावर त्यांनी तो नेता बहुतेक महाराष्ट्रातील असेल असे म्हटले आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, की भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघाची एक भूमिका आहे. त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी यावी ही संघाची भूमिका मला स्पष्टपणे दिसतेय. ज्या अर्थी मोदींना 10-11 वर्षानंतर नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटावं लागलं ही काही साधी गोष्ट नाही. इतक्या वर्षात गेले नाहीत. नड्डा यांनी संघाची गरज नाही अशी भाषा केली होती. जेव्हा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो तेव्हा ती पंतप्रधान मोदींचीच भूमिका असते. हे जेव्हा तुम्ही समजून घेता, तेव्हा मोदींना संघ कार्यालयात का जावं लागलं हे स्पष्ट आहे.
तुम्ही जे एक धोरण स्वत:साठी तयार केलं आहे, आपल्या सहकाऱ्यांसाठी, भाजपसाठी धोरण केलं आहे, की 75 व्या वर्षी निवृत्त व्हावं लागेल आणि तुम्हाला केदारनाथच्या गुंफेत जावं लागेल. फकीर आदमी है, झोला लेकर आया था. झोला भरकर जाएगा. झोला बहूत भरा है उनका, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही, मोदीजी आमचे नेते आहेत. अजून बरीच वर्ष ते काम करणार आहेत, आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे , 2029 चे पंतप्रधान म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडेच पाहतो आहोत. पूर्ण देशही तेच बघत आहे, त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघल संस्कृती आहे, त्यामुळे आत्ता कोणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही, तसा प्रश्नही नाही. जोपर्यंत माझा विषय आहे, मााझा त्याच्याशी संबंध नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.