देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलंय? संजय राऊतांचा आरोप

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून बीडमधील राजकारण राज्यभर मध्यवर्ती राहिलं आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही हे प्रकरण लावून धरलं. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड नुकताच पोलिसांच्या स्वाधीन झाला. तो सध्या बीडमधील केजमध्ये सीआयडीच्या कोठडीत आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
संजय राऊत म्हणाले, की आपल्या सरकारला खून पचवायची सवय आहे. बीडचे आका, त्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह असलेले फोटो. त्यांचा वावर, त्यांचा मंत्र्यांशी असेलला संवाद हे पाहिल्यानंतर लोकांच्या मनात शंका येते आहे की खरंच न्याय मिळेल का? देवेंद्र फडणवीस फक्त बोलत आहेत की कुणालाच सोडणार नाही. पण आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी जणांना कसं सोडलं आहे आणि किती जणांना कसं अडकवलं आहे? या विषयावर एक एसआयटी नेमली पाहिजे.
हेही वाचा – महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा; मंत्री ॲड.आशिष शेलार
देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना सोडलं आहे? किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलं आहे? किती जणांचे आक्रोश आणि किंकाळ्या दाबल्या आहेत? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनीच एसआयटी स्थापन केली पाहिजे. बीडच्या हत्या प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस गंभीर आहेत असं कळलं आहे. कारण शेवटी ही महाराष्ट्राची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी. एक वाल्मिक कराडला अटक केली. पण बीडमध्ये हा खटला चालवू नये अशी माझी मागणी आहे. हा इतका गंभीर विषय आहे की हा खटला बीडच्या बाहेर चालला पाहिजे. महाराष्ट्रात कुठेही खटला चालला तरीही न्याय मिळण्याची शक्यता नाही तरीही मानतो की मुख्यमंत्र्यांवर सध्या तरी विश्वास ठेवू. बिल क्लिंटन आम्हाला माहीत होता आता बीड क्लिंटन आला आहे. देवेंद्र फडणवीसांना सगळी प्रकरणं माहीत आहेत. त्यांनी या राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी तसंच जबाबदारीने काम करतो आहे यासाठी त्यांनी गुन्हेगार कितीही मोठा असो त्याचा विचार न करता न्याय दिला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.





