‘फाळणीवेळी भारतात आलेले लोक निर्वासित नव्हते, ते मातृभूमीसाठी लढणारे संघर्ष योद्धे होते’; सरसंघचालक मोहन भागवत

Mohan Bhagwat’s major statement : 1947 च्या भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे विधान केले आहे. हे लोक निर्वासित नव्हते, तर मातृभूमी आणि धर्मासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे संघर्ष योद्धे होते, असे भागवत यांनी म्हटले आहे. सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या 75 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी फाळणीचा इतिहास, देशभक्ती, संघर्षाची प्रेरणा आणि मूल्याधारित शिक्षणाच्या महत्वावर देखील सविस्तर भाष्य केले. History
भारताच्या फाळणीमुळे लाखो कुटुंबांचे आयुष्य उध्वस्त झाले. अनेकांना आपली घरे, शेती, उद्योग, व्यवसाय आणि अनेक पिढ्यांनी उभे केलेले संसार एका क्षणात सोडून भारतात यावे लागले. या पार्श्वभूमीवर बोलताना मोहन भागवत यांनी पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांच्या त्यागाचा विशेष उल्लेख केला. पुढे बोलताना भागवत म्हणाले की, फाळणीनंतर भारतात आलेल्या लोकांनी हा निर्णय कोणत्याही घेतला नव्हता, तर तो त्यांच्या विचारांचा आणि श्रद्धेचा निर्णय होता. त्यांना अशा भारतात राहायाचेभोटे, जिथे ते निर्भयपणे आपल्या धर्माचे पालन करू शकतील, आपली संस्कृती जपू शकतील आणि स्वाभिमानाने जीवन जगू शकतील. त्यामुळे त्यांना निर्वासित म्हणणे हा त्यांच्या संघर्षाचा अपमान ठरेल. ते मातृभूमी आणि धर्मासाठी लढणारे खरे योध्ये होते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी त्यांनी फाळणीच्या वेदनादायी इतिहासाचा देखील उल्लेख केला. भारत एकसंध ठेवण्याची लढाई आपण सर्वजण हरलो, मात्र पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांचा त्यात कोणताही दोष नव्हता. त्यांनी आपली घरे, संपत्ती, व्यवसाय आणि सुखसोयी यापैकी काहीही निवडले नाही. त्यांनी देश संस्कृती आणि धर्म यांची निवड केली. त्यामुळे त्यांच्या त्यागाचे स्मरण आणि सन्मान समाजाने कायम ठेवला पाहिजे, असे भागवत यांनी नमूद केले.
संघर्षाशिवाय यश मिळत नाही, असा संदेश देताना देखील त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले. संकटे आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. मात्र संकटे आली म्हणून हार मानू नये. माणूस पडला तरी पुन्हा उभा राहून प्रयत्न करत राहिला, तर यश निश्चित मिळते. परिस्थिती किंवा नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा त्यावर मात करण्याची जिद्द महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अडचणींपासून पळ काढणारे लोक प्रत्यक्षात सुरूवातीलाच आपला पराभव स्वीकारतात. मात्र संकटांना धैर्याने सामोरे जाणारे आणि सातत्याने प्रयत्न करणारेच शेवटी यशस्वी होतात. प्रत्येक व्यक्तीने जीवनात संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. शिक्षणाच्या विषयावर बोलताना भागवत यांनी केवळ रोजगार मिळवणे हे शिक्षणाचे अंतिम उद्दीष्ट नसल्याचे स्पष्ट केले. नोकरीसाठी शिक्षण आवश्यक असले तरी शिक्षणाचा खरा हेतू चांगला आणि जबाबदार नागरिक घडवणे हा आहे. विद्यार्थ्यांमध्ये योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची क्षमता, नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहिताची जाणीव निर्माण करणारे शिक्षणच समाजाला सक्षम बनवू शकते, असे त्यांनी अधोरेखित केले.
समाजाच्या कल्याणाची भावना असलेली, देशाच्या प्रगतीसाठी कार्य करणारी आणि आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान बाळगणारी पिढी घडवणे ही शिक्षण व्यवस्थेची सर्वात मोठी जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे फाळणीच्या इतिहासावरील चर्चा आणि पाकिस्तानातून भारतात आलेल्या नागरिकांच्या योगदानाबाबत नव्याने चर्चेला उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





