महाराष्ट्रात ऐतिहासिक कर्जमाफी! ३६ हजार कोटींची योजना मंजूर; ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Farmer Loan : अखेर शेतकऱ्यांच्या 36 हजार 585 कोटी रुपयांच्या कर्जमाफी योजनेला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या कर्जमाफी संदर्भात सहकार विभाग अटी व शर्ती संदर्भात परिपत्रक काढण्यात येणार आहे. या अटी व शर्तीनंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. 65 लाखांहून अधिक कर्जखात्यांवरचे कर्ज माफ होणार आहे.
कर्जमाफीला मंजुरी मिळाली आहे, पण आचारसंहितेमुळे घोषणा करण्यात आलेली नाही. दोन लाख रुपयांच्या मर्यादेत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेवर आज शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर केल्यानंतर बैठकीत मान्यता देण्यात आली.
हेही वाचा – सरकारचा मोठा निर्णय ! चांदीच्या आयातीबद्दल लागू केला नवा नियम; चांदी महागणार की..?
दोन लाखापर्यंत कर्ज सरकार माफ करणार असून नियमित पिक कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपयांचा प्रोत्साननिधी देखील दिला जाणार आहे. तसेच राज्य सरकारचा ग्रामीण भागाचा विकासावर भर देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकार ग्रामविकास खाते आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत येणाऱ्या विकासकामांसाठी कर्ज घेण्यात येणार आहे. ग्रामविकास खात्यासाठी 4 हजार 229 कोटी रुपये तर सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी 1 हजार दशलक्ष डॉलर इतके कर्ज घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
राज्य मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत करावयाच्या कामांसाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून (एआयआयबी) ५० कोटी डॉलर्सचे कर्जाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पासाठी एआयआयबी आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून (एनडीबी) आर्थिक सहाय्य घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या दोन्ही कर्जदात्या संस्था राज्यातील रस्ते सुधारणा आणि विकास कामांसाठी प्रत्येकी ८,७०० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य पुरवतील.
तसेच, मुंबईस्थित क्लस्टर विद्यापीठ असलेल्या हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट युनिव्हर्सिटीमध्ये सहा महाविद्यालयांचा घटक संस्था म्हणून समावेश करण्यास मंजुरी दिली.
या संस्थांमध्ये प्रिन्सिपल के. एम. कुंदननानी कॉलेज ऑफ फार्मसी, किशनचंद चेलाराम लॉ कॉलेज, श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदननानी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, ऋषी दयाराम आणि सेठ हस्साराम नॅशनल कॉलेज, सेठ वासियामुल असोमल सायन्स कॉलेज आणि थदोमल शहाणी इंजिनिअरिंग कॉलेज यांचा समावेश आहे.
अखेर शेतकरी कर्जमाफी
-36 हजार 585 कोटींची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना
– दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार
– 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार
– मात्र विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे अद्याप घोषणा नाही
-नियमित पिक कर्ज भरणाऱ्यांना 50 हजारांचा प्रोत्साहन निधी
-65 लाखांहून अधिक कर्जखात्यांवरचे कर्ज माफ होणार





