रोहित अन् विराटच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष; इंग्लंडविरुद्ध आज होणार ‘महामुकाबला’

IND vs ENG 1st ODI | इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ६ सामन्यांत (मागील सामन्यांसह) पत्कराव्या लागलेल्या दारूण पराभवानंतर, भारतीय संघ आज (मंगळवारी) पहिल्या एकदिवसीय (वनडे) सामन्यासाठी मैदानात उतरत आहे. टी-२० मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर संघाचे खचलेले मनोबल उंचावण्यासाठी आणि मालिकेत विजयी सुरुवात करण्यासाठी आज दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या महत्त्वपूर्ण एकदिवसीय मालिकेतून विराट कोहली, रोहित शर्मा आणि हुकमी एक्का जसप्रीत बुमराह हे अनुभवी खेळाडू संघात पुनरागमन करत आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक मानले जातात. पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत (ODI World Cup) संघातील आपले स्थान अधिक भक्कम करण्याचे या दोन्ही दिग्गजांचे लक्ष्य असेल. आजच्या सामन्यात त्यांच्यासमोर जोफ्रा आर्चर आणि जोश टंग यांसारख्या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचे तगडे आव्हान असेल. मात्र, रोहित आणि विराटचा इंग्लंडमधील पूर्वइतिहास पाहता ते या आव्हानाचा सामना करण्यास पूर्णपणे सज्ज आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टी-२० मध्ये आलेल्या अपयशानंतर या दोन्ही सिनिअर खेळाडूंची उपस्थिती संघाचा आत्मविश्वास वाढवणारी ठरेल.
भारताची फलंदाजी भक्कम, बुमराहच्या येण्याने गोलंदाजीला धार
नवा कर्णधार शुभमन गिलचे पुनरागमन आणि अनुभवी केएल राहुलची मधल्या फळीतील उपस्थिती यामुळे भारतीय फलंदाजीला खोली आली आहे. त्यात श्रेयस अय्यरची साथ मिळाल्यास भारताला फलंदाजीची फारशी चिंता नसेल. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे गोलंदाजी विभागावरील दडपण कमालीचे कमी होईल. युवा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारचा इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर कस लागणार असून, त्याला अर्शदीप सिंगची साथ लाभेल. हार्दिक पंड्या आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या अनुपस्थितीत शिवम दुबे चौथ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका चोख बजावणार आहे.
हेही वाचा
आखातात युद्धाचा भडका! इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भारतीय खलाशाचा मृत्यू, ८ जखमी
फिरकीची चिंता कायम, इंग्लंडला प्रदीर्घ ब्रेकची पार्श्वभूमी
गेल्या काही सामन्यांत वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांनी फलंदाजी व गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर निराशा केली आहे, त्यामुळे फिरकीची संपूर्ण मदार फॉर्मात असलेल्या कुलदीप यादववर असेल. भारतासाठी जमेची बाजू म्हणजे, इंग्लंडच्या संघाने २७ जानेवारीनंतर एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. प्रदीर्घ काळानंतर ते या प्रारूपात खेळणार आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेतील विजयामुळे यजमानांचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे.
‘जो रूट’च्या एन्ट्रीने इंग्लंड अधिक घातक
कसोटी आणि टी-२० सामन्यांनंतर एकदिवसीय फॉरमॅटमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी इंग्लंडचा संघ उत्सुक आहे. त्यातच दिग्गज फलंदाज जो रूटच्या पुनरागमनामुळे इंग्लंडची बॅटिंग लाईन-अप अधिक भक्कम झाली आहे. रूट व्यतिरिक्त हॅरी ब्रूक, जेकब बेथेल आणि कर्णधार जोस बटलर यांच्यावर इंग्लंडच्या फलंदाजीची मुख्य मदार असणार आहे. टी-२० मालिकेतील पराभवाचा वचपा काढून एकदिवसीय मालिकेत दिमाखात पुनरागमन करण्यासाठी भारतीय संघ आज सर्वस्व पणाला लावणार, यात शंका नाही.





