‘पंढरपुरात नेत्यांचे नव्हे, तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा’; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे जाऊन आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी केलेल्या व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा काल घेतला. तसेच वारकऱ्यांची संवादही साधला. यावेळी त्यांच्या लक्षात आले की पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांनी त्यांच्या राजकीय नेत्यांचे स्वागताचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. पंढरपूरला राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी येतात.
हेही वाचा – ‘भारतातील सर्व मुस्लीम आधी हिंदू होते आणि त्याआधी..’; रामदास आठवलेंचं विधान चर्चेत
विठ्ठल रखुमाई हे त्यांचे श्रद्धास्थान आहे, अशावेळी राजकीय पक्षांचे बॅनर्स लावण्यापेक्षा मजल दरमजल विठूनामाचा गजर करत येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावले पाहिजेत, असे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सुचवले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनादेखील आवश्यक त्या सूचना केल्या.





