‘भारतातील सर्व मुस्लीम आधी हिंदू होते आणि त्याआधी..’; रामदास आठवलेंचं विधान चर्चेत
मुंबई : भारतातील मुस्लीम समुदायाविषयी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक मोठं विधान केलं आहे. भारतातील सर्व मुस्लीम आधी हिंदूच होते आणि ते हिंदू होण्यापूर्वी बौद्ध होते, असं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे.
रामदास आठवले म्हणाले की, औरंगजेब इथला नाही. भारतातील सर्व मुसलमान पूर्वी हिंदूच होते. ते हिंदू होण्यापूर्वी सर्वजण बौद्ध होते. बौद्ध होण्यापूर्वी सर्व वैदिक होते. त्यामुळे हे बाहेरून आलेले मुसलमान नाहीत. म्हणूनच हिंदूंनी मुसलमानांना समजून घेणं आवश्यक आहे आणि मुसलमानांनीही हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेणं आवश्यक आहे.
हेही वाचा – संभाजी भिडेंवर तात्काळ देशद्रोहाचा खटला दाखल करा, संभाजी ब्रिगेडची मागणी
औरंगजेबाचा उदो उदो करण्याची भूमिका योग्य नाही. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाचा उदो उदो करून हिंदू समाजात जाणीवपूर्वक रोष निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही मुस्लिमांविरोधात अजिबात नाही. त्यामुळे मुद्दाम काहीतरी खोड काढण्याचा प्रयत्न कुणी करू नये. आमचं सर्व मुस्लिमांना हेच सांगणं आहे की, काँग्रेसवाले आणि विरोधीपक्षवाले तुम्हाला भडकावत आहेत. त्यामुळे मुस्लिमांनी त्याचं ऐकू नये, असं रामदास आठवले म्हणाले.
भाजपाचा मुस्लीम विभाग आहे आणि माझ्या पक्षाचाही मुस्लीम विभाग आहे. आम्ही आमच्या पक्षात मुस्लिमांना आणण्याचा मोठा प्रमाणावर प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे अशा दंगली महाराष्ट्रात आणि इतरत्र होऊ नये. तसेच विनाकारण कुणीही वाद निर्माण करू नये असं माझं मत आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.