“महागाई नियंत्रण म्हणजे टप्प्याटप्प्याने धक्के देणं नव्हे”; सिलिंडर दरवाढीवरून शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

मुंबई | घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेल्या २९ रुपयांच्या दरवाढीनंतर आता देशातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट शब्दांत निशाणा साधला आहे. “महागाई नियंत्रणात ठेवू असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं, पण याचा अर्थ टप्प्याटप्प्याने जनतेला धक्के देणं असा होत नाही,” अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली आहे.
दरवाढीबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सरकारला राजकीय परिणामांचा इशारा दिला. ते म्हणाले, “सातत्याने जर ही दरवाढ होते आहे. ही दरवाढ होत होत कुठवर आलीये बघितलं आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा सामान्य माणसांच्या प्रपंचावर होतो. पंतप्रधानांनी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रणात ठेवू, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्या टप्प्याने हा धक्के द्यायचे हे त्याचं सूत्र आहे, त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल.”
हेही वाचा
२ कोटी १७ लाख रुपये किमतीच्या औषध व वैद्यकीय साहित्य साठ्यावर कारवाई
घरगुती सिलिंडर २९ रुपयांनी महागला
कमर्शियल सिलिंडरच्या दरवाढीनंतर आता घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरमध्ये थेट २९ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे मुंबई, दिल्ली, कोलकातासह देशभरात गॅस महागला असून मुंबईत सिलिंडरची किंमत ९१२ रुपयांवरून थेट ९४१ रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या तीन महिन्यांत घरगुती सिलिंडरच्या किमतीत झालेली ही दुसरी वाढ असल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
आगामी काळात दर आणखी वाढण्याची चिन्हे
पेट्रोल, डिझेल आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीमुळे आधीच महागाईने पिचलेल्या सर्वसामान्य नागरिकाला या निर्णयामुळे आणखी एक मोठा फटका बसला आहे. एलपीजी गॅसचे उत्पादन करणाऱ्या सरकारी कंपन्यांना अजूनही प्रत्येक सिलिंडरमागे सुमारे ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे कंपन्यांचा हा तोटा भरून काढण्यासाठी आगामी काळात गॅस सिलिंडरच्या किमती आणखी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आगामी दिवसांत सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री बसणार हे स्पष्ट आहे.





