‘राज्यातील बहिणींनी बांधलेली राखी हेच माझे सुरक्षा कवच’; उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी : राज्यातील बहिणींनी बांधलेली राखी हेच माझे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे मला कोणी काहीही करू शकत नाही. मी महाराष्ट्रभर फिरत राहणार, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळेगाव दाभाडे येथे व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे शुक्रवारी तळेगाव दाभाडे येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त मावळ तालुक्यातील महिलांनी यावेळी विक्रमी गर्दी केली होती. सभास्थानी जागा अपुरी पडल्यामुळे बाहेरचे रस्ते देखील महिलांच्या गर्दीने फुलून गेले होते.
थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील शाळेच्या भव्य मैदानावर झालेल्या या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, मावळचे आमदार सुनिल शेळके तसेच सुरेश घुले,प्रदीप गारटकर,बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, संतोष भेगडे, बाबुराव वायकर, सुरेश धोत्रे, कृष्णा कारके, गणेश काकडे, रुपाली दाभाडे, सुरेश चौधरी, गणेश ढोरे, उद्योजक शंकरराव शेळके, दिपाली गराडे, सारिका शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध समाज घटकातील महिलांनी अजित पवारांना प्रतिनिधिक राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
हेही वाचा – क्रिकेटप्रेमींनो लवकरच रंगणार दुलीप ट्रॉफी स्पर्धा! BCCI ने निवडले चार नवे कर्णधार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुदानाची रक्कम राज्यातील महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.आत्तापर्यंत ९० लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली असून उद्यापर्यंत हा आकडा सव्वा कोटीच्या पुढे गेलेला असेल. पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील महिलांच्या बँक खात्यात दिनांक १७ ऑगस्ट रोजी प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झालेले असतील, अशी माहिती पवार यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांचा पवार यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. ही योजना निवडणुकीपुरती नाही. योजनेसाठी राज्याच्या अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे.राज्यातील माता-भगिनी व जनतेच्या आशीर्वादाने महायुती पुन्हा सत्तेत येऊन पुढील पाच वर्षे देखील ही योजना सुरू राहील. एकदा दिलेली ओवाळणी परत घेतली जात नाही. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना कोणीही बळी पडू नये, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
यावेळी महायुती शासनाने महिला, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुण अशा विविध घटकांसाठी घेतलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णय यांची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी भाषणात दिली.
आमदार सुनिल शेळके यांनी विक्रमी संख्येने उपस्थित राहिलेल्या भगिनींविषयी प्रास्ताविकात कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी उठून आमदार शेळके यांच्या पाठीवर थाप मारत त्यांना सावरण्यासाठी मदत केली.मावळच्या जनतेने साडेचार वर्षांपूर्वी माझ्यावर विश्वास ठेवला, तो मी सार्थ करुन दाखवला, असे नमूद करत आमदार शेळके यांनी तालुक्यात केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.
अजित पवार यांनी पिंपरी- चिंचवडचा आणि बारामतीचा कायापालट केला, पण दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. याची सल मनाला अजूनही बोचते, अशी खंत शेळके यांनी व्यक्त केली. अजितदादांनी मावळसाठी खूप काही केले आहे. आणि मावळची जनता त्याची नक्की जाण ठेवील. मावळची जनता विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणारी नाही, अशी ग्वामावळच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे, असे कळकळीचे आवाहनही शेळके यांनी यावेळी केले. मावळच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे, असे कळकळीचे आवाहनही शेळके यांनी यावेळी केले. जनसन्मान यात्रा व रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी मंगळागौरीच्या खेळांचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते.





