ODI World Cup २०२३ : भारत-पाकिस्तान सामन्याला मनसेचा विरोध
मुंबई : ICC क्रिकेट विश्वचषक २०२३ चं वेळापत्रक नुकतच जाहीर केलं आहे. ५ ऑक्टोंबरपासून भारतात विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. तर सर्वात हायव्होल्टेज भारत-पाकिस्तान सामना १५ ऑक्टोंबरला गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे.हे मा.बाळासाहेबांना कदापिही पटलं नसत आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावं हे तर पटूच शकत नाही यावर भा ज प आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे उ बा ठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे, असं संदीप देशपांडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा – Pune : तरूणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, ३ पोलीस कर्मचारी निलंबित
ज्यांनी २६/११ चा हल्ला केला, पुलवामासारखा हल्ला केला. आपल्या अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. असंख्य गोष्टी पाकिस्तान भारताविरोधात करतं. लोक म्हणतात खेळात राजकारण नको वगैरे. पण हेच पाकिस्तानी खेळाडू वेळोवेळी काश्मीरबद्दल त्यांचं मतप्रदर्शन ट्वीटद्वारे करत असतात. मग त्यांना वेगळं कसं ठेवता येईल? ज्यांनी भारताला कायम पाण्यात पाहिलं आहे त्याचं भारतात स्वागत केलं पाहिजे का? याचा विचार केला पाहिजे. केवळ हा सामन्यासंदर्भातील विषय नाही. हा सामना पाहायला पाकिस्तानमधून लोक येणार, ते त्यांचे झेंडे घेऊन येणार, ते झेंडे फडकवणार आपण देश म्हणून हे पाहणार का? सहन करणार का? यावर देशात चर्चा झाली पाहिजे, असं संदीप देशपांडे म्हणाले.
सरकार आणि विरोधी पक्षालाही हा प्रश्न आहे. २६/११ आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. काय झालं त्यावेळी हे पाहिलं आहे. पुलवामामध्ये आपले जवान शहीद झाले. बॉम्बस्फोट किती झाले याची तर गणतीच नाही. देशभरात. या सगळ्याप्रमाणे कोण होता तर पाकिस्तान होता. या पाकिस्तानच्या खेळाडूंचं आपण भारतामध्ये स्वागत करायचं का? हा प्रश्न माझ्या मनात उभा राहिला तसा हा प्रश्न देशाच्या मनात उभा राहिला असेल, असंही संदीप देशपांडे म्हणाले.