breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ना पोलिसांची भीती, ना शिवसैनिकांचा अडसर; राणा दाम्पत्याने ‘या’ कारणांमुळे दिल्ली गाठली?

मुंबई: राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं निवासस्थान ‘मातोश्री’बाहेर येऊन हनुमान चालिसा वाचण्याचा चंग बांधला. त्यामुळे त्यांना १४ दिवस तुरुंगात रहावं लागलं. सुटका होताच त्यांनी दिल्ली गाठली. राणा दाम्पत्याला जे मुंबईत करायचं होतं, ते त्यांनी दिल्लीत केलं. आज दिल्लीतल्या मंदिरात राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा वाचली. पण, महाराष्ट्र सोडून थेट दिल्लीत हनुमान चालिसा का वाचावी लागली? ठाकरेंना आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याला ना अमरावती, ना मुंबई अशी परिस्थिती का झालीये? राणा दाम्पत्य त्या १४ दिवसाच्या तुरुंगवासाने घाबरलंय का, असा प्रश्न नक्कीच उपस्थित राहातोय.

  • राणांनी दिल्ली का गाठली, याची कारणं –

याचं पहिलं कारण, जे त्यांनीच स्वतः सांगितलं, ते म्हणजे महाराष्ट्र सरकारने जो अन्याय केलाय, त्याची तक्रार राणांनी दिल्ली दरबारी केली. नवनीत राणा या खासदार आहेत आणि त्या प्रतिनिधित्व करतात त्या सभागृहाच्या प्रमुखांकडे ही तक्रार करण्यात आली. ठाकरे सरकारच्या पोलिसांनी हीन वागणूक दिली, खोटी कलमं लावून तुरुंगात डांबल्याची राणांची तक्रार होती. पण, तक्रार केल्यानंतरही राणा दाम्पत्य दिल्लीतच थांबलं. त्यांनी माघार न घेता पुढचा कार्यक्रम जाहीर केला.

उद्धव ठाकरेंच्या सभेच्या दिवशीच म्हणजे आज (शनिवार १४ मे) सकाळी दिल्लीत महाआरतीचं आयोजन केलं आणि शिवसेनेला पुन्हा खुलं चॅलेंज दिलं. पण, राणा दाम्पत्याला महाराष्ट्रातल्या पक्षाला उत्तर देण्यासाठी दिल्ली का निवडावी लागली, त्यांना यासाठी मुंबई किंवा स्वतःचा मतदारसंघ असलेल्या अमरावतीचा पर्याय नव्हता का, असाही प्रश्न पडतो.

दुसरं म्हणजे, राणा दाम्पत्याला कोर्टाने जामीन मंजूर केला, तेव्हा काही अटीही घातल्या. या अटींचा भंग झाल्याचं सरकारने आधीच म्हटलंय. ठाकरे सरकारला उत्तर द्यायचं तर हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर माघार घेणं राणा दाम्पत्याला परवडणारं नाही. पण, हनुमान चालिसेचा आग्रह महाराष्ट्रात राहून करणं शक्य नाही हे राणांनीही ओळखलं. कारण, मुंबईत पोलिसांचा पहारा तर आहेच, शिवाय आक्रमक शिवसैनिकांचाही अनुभव राणा दाम्पत्याने घेतलाय. त्यासाठी राणांनी दिल्ली निवडली असावी.

दिल्लीत राणांना किमान पोलिसांची तरी भीती नसेल हे जगजाहीर आहे. कारण, दिल्लीत सत्ता केजरीवालांची असली तरी पोलीस हे गृहमंत्री अमित शाहांचे आहेत. सातत्याने मोदी सरकारचं कौतुक करणाऱ्या नवनीत राणांसाठी दिल्लीसारखं दुसरं सुरक्षित स्थळ सध्या तरी नाही. याशिवाय जामिनाच्या अटींचं उल्लंघन टाळण्याचाही मार्ग राणांना दिल्लीच्या निमित्ताने सापडला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button