पुढच्या 72 तासांमध्ये हवामान बदलणार! मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर

Monsoon Rain Update : उष्णतेच्या वाढत्या तडाख्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 23 मे रोजी नैऋत्य मान्सूनने नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन परिसर तसेच बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांमध्ये यशस्वीपणे आगेकूच केली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस मान्सूनच्या प्रगतीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण राहणार आहे. त्यामुळे मान्सूनचा वेग आणखी वाढण्याची शक्यता असून, नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन परिसर, बंगालच्या उपसागराचा मोठा भाग आणि उर्वरित अंदमान समुद्रही लवकरच मान्सूनच्या प्रभावाखाली येऊ शकतो.
यंदा मान्सून केरळमध्ये नेहमीपेक्षा आधी दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. साधारणपणे मान्सून केरळ किनारपट्टीवर यावर्षी 26 मे रोजीच धडक देऊ शकतो. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्यामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग मिळाला आहे.
विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या मार्गात अडथळे निर्माण होण्याची शक्यता कमी असून, त्याची आगेकूच सुरळीत होईल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकऱ्यांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सूनचा वेग कायम राहिल्यास 5 जूनपर्यंत तो गोव्यात पोहोचू शकतो. त्यानंतर 6 जूनला कोकणात आणि 7 जूनला पुण्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विदर्भात मात्र पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





