कोकणासह घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी; ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तर विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; हवामान विभागाचा अंदाज काय?

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानामध्ये मोठी तापवत पाहायला मिळत आहे. कुठे उष्णतेचा कहर बघायला मिळत असून तापमानाच्या पाऱ्याने चक्क 46 ते 47 अंशाचा टप्पा पार केला आहे. तर कुठे मान्सूनपूर्व पावसाने एकच दाणादाण उडवल्याचे चित्र आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा सर्वाधिक फटका आता शेतकऱ्यांना होतांना दिसतोय. अशातच हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह पुणे, कोल्हापूर, सातारा आणि घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाची . शक्यता वर्तवत पावसाचं ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. तर दुसरीकडे विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कहर आज (24 मे) देखील कायम राहणार आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सूर्य अक्षरशः आग ओकत असून तिथे उष्णतेच्या लाटेचा तीव्र इशारा देण्यात आला आहे. संभाव्य इशारा लक्ष्यात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, गरज नसेल तर दुपारच्या सत्रात घराबाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या आहे.
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, देशात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी ब्रह्मपुरीत सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी ब्रह्मपुरीत 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्या सोबतच, चंद्रपुरातील तापमान देखील 46.2 अंशांवर नोंदवलं गेलं आहे. तर आज देखील विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याने येथे ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार, रत्नागिरीत सकाळपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी मॉन्सूनपूर्व पाऊस कोसळतोय. तर दक्षिण रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी कोसळत असल्याची माहिती आहे. रत्नागिरी राजापूर लांजा संगमेश्वर या भागात मॉन्सूनपूर्व पाऊस पडत असून हवामान विभागाने पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. मॉन्सूनपूर्व पावसाच्या अनेक ठिकाणी सरींमुळे हवेत गारवा निर्माण झाल्याचे चित्र आहे. पुढील दोन दिवस अशाच पद्धतीने पावसाच्या सरी बरसतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांमध्ये आणि प्रामुख्याने त्यांच्या घाट परिसरात वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून हवामान विभागाने या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
हेही वाचा – राज्यातील धरणांमध्ये ३०.८८ टक्के पाणीसाठा; पुणे विभाग सर्वात कमी पाणी
दुसरीकडे, जालन्यात मान्सून पूर्व पावसाचा केळी बागांना मोठा फटका बसला असून यात एका महिला शेतकऱ्यांची केळी बाग उध्वस्त झाली आहे. दरम्यान, परतुर तालुक्यातील फुलवाडी शिवारात झाडाची फांदी पडून महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर सौरऊर्जेचे पॅनलचेही मोठं नुकसान झालं असून यात एक पशुधन दगावले आहे.
विदर्भात तीव्र उष्णतेची लाट पसरली असून याचे परिणाम आता प्रकर्षाने जाणवू लागले आहे. यवतमाळच्या दिग्रसमध्ये एकाच दिवशी तिघांचा उष्मघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. यातील एकाची ओळख पटली असून इतर दोघांची ओळख अद्यापही पटली नाहीये. दिग्रस शहरातील वेगवेगळ्या भागात हे मृतदेह आढळून आले असून या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सूर्याने आग ओळखण्यास सुरुवात केली असताना एकाच दिवशी तिघांचा उष्मघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ओळख पटलेल्या मृतांचे नाव आनंद राजु वाडवे (26, राहणार म्हैस गव्हाणे, हिंगोली) असे असून दोघांची ओळख पटलेली नाही.
भंडाऱ्यात सलग चौथ्या दिवशी 45 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. अगदी सकाळपासून उष्ण वारा आणि कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. असह्य उकड्यामुळे अनेकांनी शीतपेयाची दुकानात थंड पेय पिऊन शरीराची होणारी लाहीलाहीपासून बचाव करताना नागरिक बघायला मिळालेत. तर, प्रचंड उष्णतेमुळं रस्त्यांवर तुरळक वाहतूक बघायला मिळाली.
जालना जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. परतुर तालुक्यातील फुलवाडी येथील महिला शेतकरी यशोदा अब्दल यांची तब्बल दीड एकर केळी बाग वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाली आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने केळीची झाडे आडवी पडल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, फुलवाडी शिवारात झाडाची मोठी फांदी पडून एक महिला जखमी झाली असून सौरऊर्जेच्या पॅनलचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच एका पशुधनाचाही मृत्यू झाला आहे. मान्सूनपूर्व पावसाने परतुर, घनसावंगी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा दिला आहे. हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झालेत.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत असून येत्या २९ मेपासून राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारेही वेगाने पुढे सरकत असल्याने मान्सून महाराष्ट्रात नेहमीपेक्षा काही दिवस आधी दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीबाबत घाईगडबड करू नये, असा महत्त्वपूर्ण इशारा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी दिला आहे.





