शाळेत शिक्षकांचा तुटवडा असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं मोठं नुकसान
विद्यार्थीनी तक्रार घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांकडं, विद्यार्थीनींना शिक्षणाधिकाऱ्यांनी तुरुंगात टाकण्याची धमकी
रायपूर : शाळेत शिक्षकांचा तुटवडा असल्यानं विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं मोठं नुकसान होत असल्याची तक्रार घेऊन काही विद्यार्थीनी शिक्षणाधिकाऱ्यांकडं गेल्या होत्या. पण शिक्षणाधिकाऱ्यांनी या विद्यार्थीनींना चक्क तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उद्या शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळं देशातील शिक्षण व्यवस्थेचं वास्तव उघडं पडलं आहे.
नेमकं काय घडलं?
एका माध्यमिक विद्यालयाचं दोन वर्षांपूर्वी रुपांतर उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आलं. त्यामुळं या शाळेत आता इयत्ता बारावी पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग खुला झाला. यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेतला. पण आता या विद्यार्थ्यांचं बारावीचं वर्ष असताना त्यांना अकरावीत असतानाही एकही शिक्षक शिकवण्यासाठी नव्हता.
पण आता बारावीचं बोर्डाच्या परीक्षेचं वर्ष असल्यानं वैतागलेल्या इतर माध्यमिकच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह जिल्हा कलेक्टरच्या कार्यक्रमात हजेरी लावून त्यांच्या कानावर ही समस्या घातली. यानंतर कलेक्टरनं या विद्यार्थ्यांना सांगितलं की दोन दिवसांत तुमची शिक्षकांची अडचण दूर होईल त्यासाठी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना जाऊन भेटा.
त्यानुसार, शिक्षकांसह हे विद्यार्थी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याकडं गेले आणि त्यांनी आपलं गाऱ्हाणं त्यांच्यासमोर मांडायला सुरुवात केली. पण जिल्हा शिक्षण अधिकारी अभयकुमार जैयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना फटकारलं. तसंच “तुम्ही इथं काशासाठी आला आहात निघा इथून. अशा पद्धतीच्या तक्रारी करायला तुम्हाला कोणी शिकवलं. तीन दिवस तुम्हाला तुरुंगात पाठवलं ना तर जागेवर याल तुम्ही” अशा भाषेत या विद्यार्थ्यांना शिक्षण अधिकाऱ्यानं धमकावलं. या प्रकाराचं विद्यार्थ्यांवर दडपण आलं असून माध्यमांसमोर घडलेला प्रकार कथन करताना त्यांना अश्रू अनावर झाले.
छत्तीसगडमध्ये सामाजिक मागासलेपण
छत्तीसगडच्या राजनांदगाव इथल्या शाळेत हा प्रकार घडला आहे. छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक मागासलेपण अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत या राज्यात जर अशा घटना घडत असतील तर देशातील शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांबाबत किती बेफिकिरी आहे, हे कळून येतं. उद्या साजऱ्या होणाऱ्या शिक्षण दिनाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली असल्यानं सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.





