शेतकऱ्यांची दहशतवाद्यांशी तुलना, कंगनाविरोधात तक्रार दाखल

बंगळुरु | अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतविरोधात कर्नाटकमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगनाने ट्विट करत शेकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप तक्रारदाराने तक्रारित केला आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांना देशभरात विरोध होतोय. कंगनाने कृषी विधेयकांचे समर्थन करत ट्विट केले होते. देशभरात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनांवर तिने आपल्या ट्विटमध्ये भाष्य केले. याच ट्विटमुळे शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप कंगनावर झाला आहे. आता हेच ट्विट कंगनाला चांगलंच भोवल्याचं दिसतंय. कर्नाटकातील तुमकुर येथे कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रस्तावित विधेयकं शेतकरी हिताची नसून शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधणारी आहेत, असा आरोप देशभरातील शेतकऱ्यांकडून होतोय. प्रस्तावित विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं, तर शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतही मिळणार नाही, असा सूरही आळवला जातोय. त्यामुळे विधेयकांविरोधात देशभरात शेतकऱ्यांकडून आंदोलनं होताना दिसत आहेत. याच विधेयकांमुळे राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला होता.





