साताऱ्यातील ‘किसनवीर’ला वाचविण्यासाठी वेळ आली तर शिवसेना निवडणूक लढणार
सातारा | जिल्ह्यातील किसनवीर साखर कारखान्याचा एकूण तोटा १७५ कोटींच्या घरात आहे. या कारखान्याने प्रतापगड व खंडाळा हे युनिट चालवायला घेतल्यामुळेच किसनवीरच्या आर्थिक अडचणी वाढून वाई तालुक्याची सहकार चळवळ धोक्यात आली आहे. पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला हा कारखाना वाचविणे ही येथील शेतकऱ्यांची गरज आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत वेळ आली तर आम्ही निवडणुकीत उतरून पॅनेल टाकू अशी घोषणा किसनवीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिवंगत गजानन बाबर यांचे पुतणे आणि पिंपरी चिंचवडचे शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर यांनी येथील पत्रकार परिषदेत केली.
यावेळी योगेश बाबर पुढे म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून देणी थकली असल्याने सहकार खात्याने कारखान्याची चौकशी करून कारवाई मात्र प्रलंबित ठेवली आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना वाचविणे गरजेचे आहे.तरी राजकारण बाजूला ठेऊन देणी चुकती करून कारखाना वाचविला जावा ही शेतकऱ्यांचीमानसिकता आहे. तसेच आगामी काळात या कारखान्याची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.त्यासाठी मतदारयाद्या बनविण्याचे कामही सुरू झाले आहे.त्यामुळे यंदाची लढाई ही केवळ कारखाना वाचविण्याच्या मुद्द्यावर लढवली जावी.यामध्ये कोणतेही राजकारण असू नये. ४०० कोटी कर्ज कसे फेडले जाईल याचे स्पष्ट धोरण निवडणूक लढविणाऱ्याकडे असले पाहिजे.३०० कोटींची थकबाकी आणि ६७ कोटी व्याज याचे स्पष्ट विवरण डोळ्यासमोर असले पाहिजे. दोन युनिट बंद पडल्याने कारखान्याचा तोटा वाढला.या युनिटच्या भांडवलाची तरतूद असली पाहिजे.अशा परिस्थितीत आम्ही मात्र वेळ आली तर निवडणुकीत उतरणारच अशी महत्वपूर्ण घोषणाच योगेश बाबर यांनी यावेळी केली.या पत्रकार परिषदेस शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते,किरण खामकर आणि अविनाश फडतरे हे उपस्थित होते.