ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘रिफायनरी बाबतचा निर्णय केंद्र शासन घेईल’

रत्नागिरी | कोकणात सध्या राजापूर रिफायनरीचा विषय चर्चेचा ठरला आहे. त्यातच आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी रिफायनरी बाबत भाष्य करत महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ‘रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. समर्थक व विरोधी गट या दोन्ही बाजूच्या भूमिका मुख्यमंत्री ऐकून घेतील केंद्र शासनाला मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात राजापूर बारसू ही जागा आम्ही निश्चित केली आहे. आता त्या ठिकाणी रिफायनरी करायची किंवा नाही हा निर्णय केंद्र सरकारने घ्यायचा आहे. केंद्र शासनाचा निर्णय झाल्यावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू’, अशी सावध प्रतिक्रिया देत त्यांनी रिफायनरीचा निर्णय केंद्र शासनाच्या हातात असल्याचे सूचित केले.

जमिनीचा मोबदला हा थेट शेतकऱ्यांनाच मिळायला हवा…

‘रिफायनरी जर येणार असेल तर जमिनीचा मोबदला हा थेट शेतकऱ्यांनाच मिळायला हवा अशी आपली भूमिका आहे. यासाठी काही जमिनी परप्रांतीय परदेशी लोकांनी घेऊन काही चुकीचे व्यवहार झाले असतील तर त्याची चौकशी करण्याचे आदेश आपण प्रशासनाला देऊ’, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रिफायनरी समर्थक व विरोधी गट या दोन्ही गटांच्या बाजूचे म्हणणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ऐकून घेतील व याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असं सामंत यांनी यावेळी सांगितलं.

कोणीही किती राजकारण तापवू दे या जिल्हयात फरक पडत नाही!..

‘महाराष्ट्रात सध्या हनुमान चालीसा आणि भोंगा यावरुन राजकीय वातावरण चांगलेचं तापले आहे. मात्र, हे राजकारण कोणीही कितीही तापवण्याचा प्रयत्न केला तरी जिल्हयात काही फरक पडत नाही. कारण येथील आमदार कोणाचे आहेत हे सगळयांना माहित आहे. सध्याचं राजकीय वातावरण जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते फार अडचणीच्या पध्दतीने सुरू आहे. अतिशय वाईट पध्दतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत’, असे सांगत आपण राजकीय विरहित कार्यक्रमाला आलो असल्याने आपण आज कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button