विकासकामांसाठी एकत्र येणं चांगली गोष्ट; MIM च्या युतीबाबत सुप्रिया सुळेंची भूमिका
मुंबई | राष्ट्रवादी पक्ष एमआयएमआय पक्षासोबत युती करणार असल्याची माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आले असून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. त्यातच, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजकीय विषयांमध्ये कुणाला एकत्र काम करायचे असेल तर एकत्र आलं पाहिजे. समविचारी पक्ष सगळ्यांनी एकत्र येणं ही आनंदाची गोष्टी आहे. विकासकामासाठी सर्वजण काहीजण एकत्र येत असतील तर ती सर्वांसाठीच चांगली गोष्ट आहे. सर्व राज्यांसाठी हे चांगलं आहे, असेही त्या म्हणाल्या. तर शिवसेनेच्या काही नेत्यांनी मात्र यावर कडाडून टीका करत भाजपवर आरोप केले आहेत. शिवसेनेबाबत बोलताना मात्र सुप्रिया सुळेंनी मला विषय माहिती नाही म्हणत सावध पवित्रा घेतला आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे नेते व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची जालन्यात बैठक झाली. त्यात राजकीय चर्चा झाली. आम्हाला नेहमीच भाजपची ‘बी टीम’ म्हणून हिणवतात. पण आमच्याशी कोणीच युतीला तयार होत नाहीत. तेव्हा आम्ही राष्ट्रवादीला युतीची ऑफर दिली आहे. महाविकास आघाडीत सामिल होण्याची आमची इच्छा आहे. तेव्हा यावर ते काय प्रतिसाद देतात याकडे आमचे लक्ष लागले आहे, असे खासदार जलील यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाची शक्यता आहे.
दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचे निधन झाले म्हणून राजेश टोपे गेले असतील. अशावेळी राजकीय चर्चा करायची नसते. टोपे यांनी ती केली नसेल याची खात्री आहे. या चर्चेबाबत काही विधान करण्याची गरज नाही. निधन झालेलं असताना जाणं आणि राजकीय चर्चा करणं ही आमची संस्कृती नाही, असं जयंत पाटील म्हणाले. तर शिवसेनेने हिंदुत्वाची चादर बाजूला टाकली आहे. उद्धव ठाकरे उद्या ‘आयसीस’शीही चर्चा करतील, अशी टीका शनिवारी भाजप नेते नितेश राणे यांनी केली.