प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर लसींचा तुटवडा जाणवला नसता- उदयनराजे भोसले
सातारा – प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असं वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
मी व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असते तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही, असं उदयनराजे भोसले म्हणाले. तसेच शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद ठेवायला कोरोना व्हायरस फक्त तेव्हाच बाहेर येतो का?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला.
व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे? सणासुदीचे दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. उद्या बँका हप्ते भरण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागतील. त्यामुळे दुकानातील कामगारांना लस द्यावी. कामगारांना लस देऊनही दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसेल तर व्यापारी कसं ऐकणार, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.
कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. लोकांनी पहिल्या लॉकडाऊनवेळी ऐकले. आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, असं उदयनराजे म्हणाले.