मध्य रेल्वेचा प्लॅटफाॅर्मवरील गर्दी टाळण्यासाठी ‘हा’ महत्वपुर्ण निर्णय
मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पाहायला मिळत आहे. त्यातच मुंबईतील रुग्णांचा आकडा हा चिंताजनक आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी या निर्णयाची माहिती देताना म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आणि मुंबईच्या रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत असताना पाहायला मिळत असल्याने मध्य रेल्वेच्या मुंबईतील काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट देण्यात येणार नाही.
मुंबईमधील कुर्ला टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकांवर इथून पुढे प्लॅटफॉर्म तिकीट बंद असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलवर गर्दी टाळण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंध लावण्याचे संकेत नुकतेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्यानंतर मध्य रेल्वेने गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट बंद करून कोरोना रोखण्यासाठी एक पाऊल उचललं आहे. पण आतातरी अनावश्यक गर्दी करणाऱ्यांची संख्या कमी होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.