राज्यात पुन्हा पाऊस परतणार, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दांडी मारली आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा पाऊस परतणार आहे. राज्यात श्रावण सरी आता सुरू होणार आहे. २५ ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातल्या नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि जळगावला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
हेही वाचा – ‘सामना’च्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका!
पुणे जिल्ह्यात पाऊस
हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. पुढील ३ दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूरसह जवळपास सर्व जिल्ह्यात मुसळधार जलधारा बरसणार आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली कोल्हापूरत मध्यम पावसाची शक्यता आहे.