रिलायन्स कॅपिटलचे संचालक मंडळ बरखास्त! आरबीआयची कारवाई
मुंबई – उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट काही संपण्याचे नाव घेत नाही. आता भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या उद्योग समूहातील प्रमुख कंपनी रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेली ही नॉन बँकिंग कंपनी दिवाळखोर म्हणून जाहीर करण्याची प्रक्रिया आरबीआयने सुरू केली आहे. या कारवाईमुळे अनिल अंबानींचा पाय आणखी खोलात रुतला आहे.
रिझर्व्ह बँकेने रिलायन्स कॅपिटलचे संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी कार्यकारी संचालक नागेश्वर राव यांची नियुक्ती केली आहे. आरबीआयच्या संचालक मंडळ बरखास्तीच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे रिलायन्स कॅपिटलने म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने अशाप्रकारे कारवाई केलेली ही देशातील तिसरी सर्वात मोठी नॉन बँकिंग वित्तीय कंपनी आहे. यापूर्वी आरबीआयने एनबीएफसी आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन यांच्यावर अशी कारवाई केली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे संचालक मंडळ आम्ही बरखास्त केले आहे. कर्जदारांची देणी भागवण्यात ही कंपनी अपयशी ठरली आहे. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले, असे आरबीआयने म्हटले आहे. रिलायन्स कॅपिटलवर सुमारे ४० हजार कोटींचे कर्ज आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत या कंपनीला १,१५६ कोटींचा तोटा झाला. ही कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडली असल्यामुळे आरबीआयने तिचे संचालक मंडळ बरखास्त करून दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.