२ वर्षांनंतर पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये कोरोनाच्या शून्य रुग्णसंख्येची नोंद
औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यात १५ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत तीन लाटा आल्या आणि गेल्या. यात ३,७३२ जणांचा मृत्यूही झाला पण रुग्णसंख्या कधीही शून्यापर्यंत आली नव्हती. आता तब्बल ७३६ दिवसांनी म्हणजे २१ मार्च २०२२ रोजी जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. आरोग्य यंत्रणेसह सर्वांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.
विशेष म्हणजे गेल्या १९ दिवसांत कोरोनाच्या मृत्यूवरही जिल्ह्याने मात केली. कारण २ मार्च २०२२ पासून एकाही बळीची नोंद झाली नव्हती. दरम्यान, रुग्णसंख्या शून्यावर पोहोचली तरी कोरोना संपलेला नाही. शासनाच्या निकषानुसार ९० टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस व ७० टक्के लोकांनी दुसरा डोस घेतल्याशिवाय आपण महामारीपासून पूर्णपणे सुरक्षित राहू शकत नाही. जिल्ह्याने ही अट पूर्ण केलेली नसल्याने काही निर्बंध कायम आहेत. सध्या एकूण रुग्णसंख्या १,६९,७४१ झाली आहे. त्यापैकी बहुतांश लोक बरे झाले असून सध्या केवळ २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.