महाविकास आघाडीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कुचंबणा : खासदार श्रीरंग बारणे
पुणे । प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कशाप्रकारची वागणूक मिळतेय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये दुजाभाव केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसैनिकांच्या मनात रोष असल्याचंही श्रीरंग बारणे यांनी बोलून दाखविले. तसेच सत्तेचा सर्वाधिक लाभ हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतो, अशी खंत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील मावळ मतदार संघातील जागा ही शिवसेने पार्थ पवार यांच्यासाठी सोडून मनाचं मोठेपण दाखवावं, अशी मागणी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. अशातच आता मावळ मतदार संघातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे संसदरत्न खासदार आहेत. त्यांच्या कामाची चुणूक आपण सर्वांनीच पाहिली आहे. महाविकास आघाडीने ठरविल्याप्रमाणे पुढील निवडणूक आघाडी लढणार आहे. त्यामुळे मावळची जागा ही पार्थ अजित पवार यांना देऊन बारणे यांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवावे. २००५ साली जेव्हा सन्माननीय सुप्रीयाताई राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेबांनी मा. सुप्रियाताईंना बिनशर्त पाठिंबा दिला होता. आज तोच दिलदारपणा माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी दाखवावा, असे माझ्या सारख्या एका सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाटते, असंही नितीन देशमुख यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.