साताऱ्यातील धोम धरणाच्या कालव्याला भगदाड, ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांत पाणी
सातारा : वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास फुटला. यामुळे झोपेत असलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांत पाणी शिरून त्यांचे संसारपयोगी साहित्य व बैल वाहून गेले. वाहून जाणारे बैल वाचवण्यात यश आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे, प्रशासन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली.
धोम धरणाचा डावा कालव्याचा भराव वाहून आज पहाटे कालवा फुटला. हजारो क्युसेक्स पाणी ओझर्डे येथील चंद्रभागा ओढ्यातून वाहत आहे. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात घुसले. शेतीचे नुकसान करत हे पाणी ओढ्यात घुसले.
हेही वाचा – सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार
ओढ्याचे पात्र मोठे असल्याने व ओढ्याला पाणी नसल्याने ऊसतोड मजुरांच्या झोपड्या, बैल, बैलगाड्या होत्या. दिवसभर ऊसतोड करून झोपलेल्या पस्तीस ऊसतोड मुजरांच्या दीडशे लोकांच्या झोपड्यांत पाणी शिरले. त्यांचे संसार उपयोगी साहित्य व १४ बैल वाहून गेले. या घटनेत जीवित हानी झाली नाही मात्र ऊसतोड मजुरांच्या झोपड्या व त्यांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले.
धोम धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडले आहे. अद्याप किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. पाण्याच्या प्रवाहने माती खचून कालवा फुटला. तत्काळ कालवा दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून शेतीसाठी पाणी सोडण्यात येईल, असे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले.